लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: समृद्धी महामार्ग हा केवळ रस्ता नाही, तर महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा ‘कॉरिडॉर’ आहे. या महामार्गाने महाराष्ट्राचे इंटिग्रेशन साधले आहे. यातून २४ जिल्हे जेएनपीटीला जोडले जाणार आहेत. तसेच लवकरच वाढवण बंदराशीही त्याची जोडणी दिली जाणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
समृद्धी महामार्गाच्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण व सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचा लोकार्पण सोहळा दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, आमदार निरंजन डावखरे, नितीन पवार, सरोज अहिरे, हिरामण खोसकर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर, एमएसआरडीसीचे व्यवस्थापकीय संचालक अनिलकुमार गायकवाड आदी उपस्थित होते.
अंतिम टप्प्याची काय आहेत खास वैशिष्ट्ये ?
५ जुळे बोगदे, ११ किलोमीटर लांबीचे. इगतपुरी येथील ८ किमी लांबीचा बोगदा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बोगदा. १०० टक्के आगविरोधी यंत्रणा. बोगद्यातील तापमान ६० अंशांवर गेल्यास स्वयंचलित पाण्याची फवारणी सुरू होईल. तापमान ३० अंशांपर्यंत खाली आल्यावर यंत्रणा बंद होईल, इगतपुरी, फूडघर आणि आमणे हे तीन प्रमुख इंटरचेंज, अपघात झाल्यास बचावासाठी जोडबोगदे.
राज्यात कुठून कुठेही फक्त ६-७ तासांत जाता येणार : शिंदे
राज्याच्या कोणत्याही कोपऱ्यातून दुसऱ्या कोपऱ्यात सहा ते सात तासांत पोहोचता यावे, यासाठी ॲक्सेस कंट्रोल महामार्गाचे जाळे तयार करीत आहोत. याचा सर्वाधिक फायदा मराठवाड्याला होणार आहे. शक्तिपीठ महामार्ग मराठवाड्यासाठी गेमचेंजर होईल. त्यातून शेतकरी आत्महत्या करणार नाही, असा विश्वास व्यक्त करतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या महामार्गामुळे मुंबईहून शिर्डीला ३ तासांत पोहोचता येणार असून, सर्वाधिक फायदा नाशिकला होणार असल्याचे सांगितले.
‘शक्तिपीठ’चे काम लवकरच सुरू होणार
पुढच्या टप्प्यात शक्तिपीठ महामार्गाचे काम हाती घ्यायचे आहे. हा महामार्ग मराठवाड्याचे आर्थिक चित्र बदलणारा ठरेल. त्याचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही फडणवीस यांनी जाहीर केले. समृद्धी महामार्गाचे काम सुरू केले तेव्हा अनेकांना हा प्रकल्प होऊ शकत नाही, असे वाटले होते. मात्र, रेकॉर्ड ब्रेक वेळेत भूसंपादन केले. आमच्या काळात हा महामार्ग सुरू झाला याचा आनंद आहे. २०१४ मध्ये जे स्वप्न पाहिले होते, त्याची आज पूर्तता होत आहे याचा आनंद आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पर्यावरण संवर्धनासाठी यंदा १० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट आहे. तर पुढील चार वर्षे दर वर्षाला २५ कोटी झाडे लावली जाणार आहेत, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले. जुन्या नागपूर-मुंबई मार्गावरून नागपूरहून मुंबईकडे येण्यास १७ ते १८ तास लागतात. समृद्धीने हाच प्रवास आता आठ तासांत होईल.
- ६१,००० - कोटी एकूण खर्च
- ७०१ किमी - एकूण लांबी
- ८ तास - प्रवासाचा कालावधी
- १०० - विशिष्ट संरचना वन्यजीवांसाठी
- १८० - ओव्हरपास आणि
- २२४ - अंडरपास पादचाऱ्यांसाठी
- ५९ - ओव्हरपास आणि
- २२९ - अंडरपास वाहनांसाठी
- २५ - इंटरचेंजमुळे इतर ठिकाणी जाता येणार
- ८ - ओव्हरपास
- ९२ - अंडरपास निर्मिती देशात प्रथमच
- ३२ - मुख्य पूल
- ३१७ - लहान पूल