आॅलिम्पिकच्या पदकासाठी सोलापुरात मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2016 17:36 IST2016-08-12T17:36:08+5:302016-08-12T17:36:08+5:30
रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात पदक मिळावे

आॅलिम्पिकच्या पदकासाठी सोलापुरात मुस्लिम बांधवांकडून सामूहिक नमाज पठण
ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. 12- रिओ आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला जास्तीत जास्त क्रीडा प्रकारात पदक मिळावे. परदेशात सुरू असलेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी भारताचे नाव उज्जवल करावे यासाठी येथील शाब्दी सोशल फाउंडेशनच्यावतीने सामुहिक नमाज पठण करून शाहजुवल दर्ग्यात चादर चढवून फुले वाहुन प्रार्थंना केली़ यावेळी भारत माता की जय भारत की रित हैं आॅलिम्पिक में जीत हैं...हम सब क हैं असा नारा दिला.
ब्राझीलच्या रिओ दी जानेरो येथे मराकाना स्टेडियमवर ३१ व्या आॅलिम्पिक स्पर्धा सुरू आहे. जगभरातील तब्बल १० हजारांहून अधिक खेळाडू रिओ २०१६ आॅलिम्पिक स्पर्धेत आपले नशीब आजमावित आहेत. भारताकडून यंदाच्या आॅलिम्पिकमध्ये एकूण ११९ खेळाडूंनी विविध खेळांसाठी आॅलिम्पिक स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. मात्र आठ दिवसापासून सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताला एकही पदक मिळाले नाही़. भारताचे प्रतिनिधित्व करणारे प्रत्येक खेळाडू हा अनुभवी व कष्ट करणारा आहे़ मात्र थोडक्या कारणासाठी भारताला पदकापासून वंचित रहावे लागत आहे.
या सर्व अडचणी दूर होवून भारताला जास्तीत जास्त पदक मिळावे, भारताचे नाव जगभर व्हावे यासाठी शाब्दी सोशल गु्रपच्यावतीने सामुहिक नमाज पठण करून शाहहुवल दर्ग्यात चादर चढवून फुले वाहण्यात आली़ यावेळी शाब्दी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रसूल पठाण,शब्बीर पठाण, सोना जमादार, मुस्ताक पठाण, समीर शेख, अझहर शेख, जलील शेख, जाईद नाईकवाडी, आतिक शेख, नजीर शेख यांच्यासह अन्य मुस्लिम बांधव व क्रिडा रसिक मोठया संख्येने उपस्थित होते़