सचिनचा टोलमुक्तीचा ‘लेटर ड्राइव्ह’! मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
By Admin | Updated: March 14, 2015 05:51 IST2015-03-14T05:51:57+5:302015-03-14T05:51:57+5:30
एरव्ही क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता मुंबईनजीकच्या टोलमुक्तीसाठी पुढाकार घेतला असून, टोलनाक्यांवर लागणा-या लांबलचक रांगांमधून प्रवाशांची सुटका करावी,

सचिनचा टोलमुक्तीचा ‘लेटर ड्राइव्ह’! मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल
मुंबई : एरव्ही क्रिकेटच्या मैदानावर फटकेबाजी करणाऱ्या सचिन तेंडुलकरने आता मुंबईनजीकच्या टोलमुक्तीसाठी पुढाकार घेतला असून, टोलनाक्यांवर लागणा-या लांबलचक रांगांमधून प्रवाशांची सुटका करावी, असे पत्र त्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवले.
मागील आठवड्यात खारघर टोलनाक्यावर वाहनांच्या गर्दीत सचिनची गाडी तब्बल तासभर अडकली होती. त्यातून झालेला मनस्ताप त्याने पत्राद्वारे व्यक्त केला आहे. मुंबई परिसरातील दहिसर, वाशी, ऐरोली, मुलुंड, घोडबंदर, तळोजा आणि डोंबिवली या टोलनाक्यांवर होणाऱ्या कोंडीमुळे प्रवाशांची शारीरिक आणि मानसिक कुचंबणा होते. त्यामुळे या नाक्यांवर आधुनिक यंत्रणा बसवून अथवा इतर पर्याय शोधून प्रवाशांची सुटका करावी, अशी मागणी या पत्रात केली आहे.
या पत्राची दखल घेत मुख्यमंत्री विधान परिषदेत म्हणाले, की सचिन तेंडुलकर याच्या पत्रावर काम सुरू केले आहे. टोलमुक्तीसाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, पण आधीच्या सरकारने टोल कंत्राटदारांशी केलेल्या करारात अनेक त्रुटी ठेवल्या आहेत. छोट्या टोलनाक्यांच्या करार रद्द करण्याची तरतूद करण्यात आली असली, तरी मुंबई-पुणे दु्रतगती महामार्गासारखे मोठे टोल रद्द करण्याची कोणतीच तरतूद नाही. त्यामुळे असे टोल तडकाफडकी रद्द केल्यास ते न्यायालयाच्या कसोटीवर टिकणार नाहीत. त्यामुळे अन्य पर्यायांचा विचार करू, असे फडणवीस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)