राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!
By Admin | Updated: April 9, 2015 01:27 IST2015-04-09T01:27:05+5:302015-04-09T01:27:05+5:30
राजघराण्यांच्या इतिहासात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या राजघराण्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय

राजघराण्यांनी घडविला नवा ‘इतिहास’!
सचिन जवळकोटे, सातारा
राजघराण्यांच्या इतिहासात अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एकमेकांवर टीका करणाऱ्या राजघराण्याचा संघर्ष आता टोकाला पोहोचलाय. कधी काळी मराठी साम्राज्याचा इतिहास घडविणारी ही दोन दिग्गज राजघराणी आज त्वेषानं एकमेकांवर तुटून पडताना पाहून अवघा महाराष्ट्र अचंबित झाला आहे. राजकीय इगोमुळं उडालेल्या या भडक्यामागचं खरं कारण मात्र निव्वळ साम्राज्यवाद हेच ठरलंय!
दोघेही ‘राजे’ आहेत. एक खासदार तर दुसरे विधान परिषद सभापती. मात्र त्यांनी केलेला शब्दच्छल धक्कादायकच आहे. विशेष म्हणजे या वादात न पडता तटस्थपणे ‘चुप्पी’ साधणाऱ्या शरद पवारांची भूमिकाही आश्चर्यचकित करणारी. अजित पवारांनी मात्र ‘पोरकटपणा थांबवावा,’ असा पोक्तसल्ला दिल्यानंतर उदयनराजेंनी त्यांच्यावरही ‘शालजोडी’तून प्रहार केला. ‘सभापतींना पोरकटपणाची उपमा देऊन अजितदादांनी महाराष्ट्राचा अपमान केला’, असं ते म्हणाले.
‘नीरा नदीचं पाणी बारामतीला पळविलं,’ या कारणावरून दोन्ही राजेंमध्ये वादाला तोंड फुटलं असलं, तरी त्यामागे गेल्या पाच वर्षांमधील खदखद आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीत सत्तांतर झाल्यानंतर सातारा जिल्ह्याला शिवसेनेचा पालकमंत्री मिळाला. पवार विरोधक असलेल्या विजय शिवतारेंनी डीपीसी बैठकीच्या व्यासपीठावर उदयनराजेंना आदरानं बसवलं. तेव्हाच ‘जमाना बदल गया है’ची चुणूक मिळाली. ‘अतिरिक्त पालकमंत्री’ असा टोमणा त्यांना रामराजेंनी हाणताच शीतयुद्ध भडकलं. त्यातच श्रीराम कारखान्याच्या निवडणुकीत उदयनराजेंनी पारंपरिक विरोधकांना पाठबळ दिल्यानं रामराजे पुरते डिवचले गेले.