विठूनामाच्या गजरात रिंगण
By Admin | Updated: July 23, 2015 01:12 IST2015-07-23T01:12:50+5:302015-07-23T01:12:50+5:30
दाटून आलेले ढग, मधेच कडकडीत ऊन, टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंगाचा गजर, तुतारीची ललकारी... विठुनामाचा अखंड सुरू असलेला जयघोष

विठूनामाच्या गजरात रिंगण
शहाजी फुरडे-पाटील / राजीव लोहोकरे , अकलूज
उंच पताका झळकती, टाळ-मृदंग वाजती,
पे्रमे आनंदे नाचती, भद्र जाती विठ्ठलाचे,
आले हरीचे विनट, वीर विठ्ठलाचे सुभट,
भेणे झाले दिकवट, पळती थाट दोषांचे.
दाटून आलेले ढग, मधेच कडकडीत ऊन, टिपेला पोहोचलेला टाळ-मृदंगाचा गजर, तुतारीची ललकारी... विठुनामाचा अखंड सुरू असलेला जयघोष व ज्ञानबा-तुकाराम अशा नामस्मरणाच्या भक्तीपूर्ण वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्यातील पहिले रिंगण अकलूजच्या सदाशिवराव माने विद्यालयात उत्साही व भक्तीपूर्ण वातावरणात झाले़ लाखो भक्तांनी हा नयनरम्य सोहळा पाहिला.
पुणे जिल्ह्यातील मुक्काम संपवून पालखी सोहळा बुधवारी सकाळी अकलूजमध्ये दाखल झाला़ अकलूजकरांचे स्वागत स्वीकारून एकामागून एक दिंड्या माने विद्यालयाच्या प्रांगणात येत होत्या़ सुरुवातीला पताकाधारी, त्यानंतर कलश व तुळशी घेतलेल्या महिला, वीणेकरी, टाळकरी, पखवाजवादक यांनी एक फेरी मारल्यानंतर पालखी सोहळ्याचे सर्व मानकरी, देहू संस्थानचे विश्वस्त यांनीदेखील धावत एक फेरी मारली़ अश्वाने पाच फेऱ्या पूर्ण केल्यानंतर त्याच्या टापाखालची माती आपल्या कपाळी लावून भाविकांनी आपल्याला तुकोबा भेटल्याची धन्यता मानली़
हरीच्या खेळाला आला रंग
बाळासाहेब बोचरे , सदाशिवनगर
नाचत जावू त्याच्या गावा रे
खेळिया सुख देईल विसावा
झाकोळलेल्या नभाखाली, टाळ-मृदंगाचा गजर आणि माऊली माऊलीच्या गजरात आसमंत दणाणले असताना दोन अश्वांनी मारलेल्या वेगवान फेऱ्यांनी अवघ्या वैष्णवजनांचे डोळे तृप्त झाले. गुरुवारी खुडूसला रिंगण करून पालखी वेळापूर येथे जाणार आहे.
आषाढी वारीसाठी ऊन-वाऱ्याची तमा न बाळगता वाटचाल करणाऱ्या वैष्णवांना कधी पंढरपुरला पोहोचेन आणि विठूरायाला भेटेन, असे झाले आहे. त्या ओढीने निघालेल्या वैष्णवांना बुधवारी सदाशिवनगरच्या मैदानावर खेळाचा मनमुराद आनंद लुटता आला.
कानात वारे शिरल्यासारखे धावणाऱ्या माऊलींच्या अश्वामागे स्वाराचा अश्व धावत होता. हा पाठशिवणीचा खेळ चालू असताना दोन फेऱ्या कधी पूर्ण झाल्या हे कळल ेसुद्धा नाही.