मुंबईत रिक्षा संपामुळे प्रवाशांचे हाल
By Admin | Updated: February 15, 2016 11:49 IST2016-02-15T11:49:00+5:302016-02-15T11:49:00+5:30
खासगी टॅक्सी सेवेला परवानगी आणि परमिट शुल्कातील वाढ याच्या निषेधार्थ मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने संप पुकारला आहे.

मुंबईत रिक्षा संपामुळे प्रवाशांचे हाल
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - खासगी टॅक्सी सेवेला परवानगी आणि परमिट शुल्कातील वाढ याच्या निषेधार्थ मुंबई ऑटोरिक्षामेन्स युनियनने संप पुकारला आहे. संपामुळे हजारो रिक्षा रस्त्यावर न उतरल्यामुळे उपनगरातील प्रवाशांचे हाल होत आहेत.
प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी राज्य वाहतूक आयुक्त श्याम वारधाने यांनी खासगी गाडया, बस आणि अन्य गाडयांना सार्वजनिक वाहतुकीची म्हणजे प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली आहे. कामावर जाणा-या नोकरदारांचे हाल होऊ नयेत यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
संपामुळे बेस्टनेही काही जादा बसगाडया सोडल्या आहेत. खासगी टॅक्सी सेवेला परवानगी आणि परमिट शुल्क वाढी विरोधात आम्ही हा संप पुकारला आहे. प्रवाशांची गैरसोय होत असेल तर, त्याला राज्य सरकार जबाबदार आहे असे मुंबई ऑटोरिक्षामेन युनियनचे नेते शशांक राव यांनी सांगितले.
आज ९० हजार रिक्षा रस्त्यावर धावत नसल्याचा दावा राव यांनी केला. उपनगरातील बहुसंख्य मुंबईकर शेअर रिक्षाने रेल्वे स्थानकांपर्यंत जातात. आज बहुसंख्य प्रवाशांना पायपीट करत रेल्वे स्थानक गाठावे लागले.