पवई तलाव होणार पुनरुज्जीवित
By Admin | Updated: October 20, 2016 06:02 IST2016-10-20T06:02:38+5:302016-10-20T06:02:38+5:30
मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.

पवई तलाव होणार पुनरुज्जीवित
मुंबई : पवई तलावाचे हरवलेले सौदर्य परत मिळवून देण्याकरिता प्रभावी उपाययोजना आखा, असे निर्देश उच्च न्यायालयाने मुंबई महापालिका, जिल्हाधिकारी यांना दिले, तर महापालिकेने तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी उपाययोजना आखल्याची माहिती उच्च न्यायालयाला दिली.
तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी येत्या सहा महिन्यांत अल्पकालीन उपाययोजनांची मालिका सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेने न्या. व्ही. एम. कानडे यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाला सांगितले.
८ सप्टेंबर रोजी महापालिकेचे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवई तलावात सोडण्यात येणारे सांडपाणी थांबवण्यासाठी व तलावाच्या सौंदर्यीकरणासाठी एखाद्या सल्लागाराची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या वकिलांनी खंडपीठाला दिली.
पवई तलावात विनाप्रक्रिया सांडपाणी सोडण्यात येते, त्याशिवाय कचराही टाकण्यात येतो. विकासक टेकडीवर अतिक्रमण करून इमारती उभारत आहेत, तरीही महापालिका संबंधितांवर काहीही कारवाई करत नाही. राज्य सरकार व महापालिकेला संबंधितांवर कारवाई करण्याचा आदेश द्यावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते शिवशंकर जोशी यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
तलावाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी काय पावले उचलणार, अशी विचारणा गेल्या सुनावणीदरम्यान खंडपीठाने जिल्हाधिकारी व महापालिकेकडे केली होती.
उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, जिल्हाधिकारी आणि महापालिकेने प्रतिज्ञापत्र सादर केले. एप्रिल २०१७ ते फेबु्रवारी २०१९ पर्यंत तलाव स्वच्छ करण्यासाठी पावले उचलण्यात येतील. याच कालावधीत पाण्याचा दर्जाही सुधारण्यात येईल. नागरिकांसाठी पार्किंगची सुविधा उपलब्ध केली जाईल आणि नागरिकांमध्ये जागरूकताही निर्माण करण्यात येईल, असे महापालिकेने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. (प्रतिनिधी)