मुंबईचे दौरे कमी करा

By Admin | Updated: June 20, 2016 04:18 IST2016-06-20T04:18:30+5:302016-06-20T04:18:30+5:30

आगामी निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराची टेस्ट आहे. त्याच्या निकालाचा संदर्भ राज्य सरकारच्या कामगिरीशी जोडला जाणार आहे.

Reduce travel to Mumbai | मुंबईचे दौरे कमी करा

मुंबईचे दौरे कमी करा

पुणे : आगामी निवडणुका म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराची टेस्ट आहे. त्याच्या निकालाचा संदर्भ राज्य सरकारच्या कामगिरीशी जोडला जाणार आहे. त्यामुळे जिंकण्याच्या इर्ष्येनेच निवडणुकांना सामोरे जा, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. त्याचबरोबर जिल्हाध्यक्षांनी आता मुंबई दौरे कमी करावेत, अशी सूचनाही त्यांनी केली.
पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या रविवारी झालेल्या समारोप सत्रात फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, बूथ संघटनांवर लक्ष केंद्रीत करायला हवे. भाजप लाटेवर निवडणूक जिंकत नाही. संघटन हीच पक्षाची ताकद आहे. बूथवरील कार्यकर्ते पक्षाचे पूर्ण वेळ कार्यकर्ते नसतात. त्यांना प्रशिक्षण द्यायला हवे.
सत्ता आली की काही लोक मी तुमचाच आहे, असे सांगत पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चिकटतात. त्यांच्या कामांसाठी जिल्हाध्यक्ष लगेचच मुंबईत येऊन धडकतात.
काहीजण आठवड्यातील पाच दिवस मुंबईतच असतात. अशा जिल्हाध्यक्षांना समज देण्यात यावी, अशी सूचनाही फडणवीस यांनी केली. तर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी कार्यकर्त्यांना वनखात्याने आयोजित केलेल्या वृक्षारोपण मोहिमेची माहिती दिली. (प्रतिनिधी)

सत्ता आली म्हणून तुमच्या राहणीमानात बदल करू नका. साधे राहा. भपकेबाज राहाण्यातून जनाधार संपतो. आपल्याला सत्तेचा पर्वत चढायचा आहे. मोहात सापडू नका. जमिनीवरच्या माणसांशी जोडून राहा, असा सल्ला प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिला.

Web Title: Reduce travel to Mumbai