देशाच्या आर्थिक प्रगतीचा विचार केल्यास महाराष्ट्र हा नेहमीच आघाडीवर राहिलेला आहे. तसेच गेल्या काही वर्षांत राज्यामध्ये येणाऱ्या परकीय गुंतवणुकीचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे. दरम्यान, २०२४-२५ या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये विक्रमी परकीय गुंतवणूक आली असून, या वर्षात देशातील एकूण गुंतवणुकीपैकी ४० टक्के गुंतवणूक ही एकट्या महाराष्ट्रात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.
याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, ‘’मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीची (जानेवारी ते मार्च २०२५) आकडेवारी सुद्धा आता जाहीर झाली असून, आता या संपूर्ण वर्षांत मिळून महाराष्ट्राने १,६४,८७५ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आकर्षित केली आहे. जी यावर्षी देशात आलेल्या एकूण गुंतवणुकीच्या ४० टक्के इतकी आहे. यावर्षी देशात आलेली गुंतवणूक ही १,२१,९२९ कोटी रुपये इतकी आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी पुढे सांगितले की, महाराष्ट्रात गेल्यावर्षीचा विचार केला तर यावर्षी त्यापेक्षा ३२ टक्के गुंतवणूक अधिक आली आहे. या शेवटच्या तिमाहीत २५,४४१ कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत हे वर्ष गेल्या १० वर्षांतील रेकॉर्ड स्थापित करणारे वर्ष ठरले. अर्थात हा रेकॉर्ड आपण पहिल्या ९ महिन्यातच मोडला होता. मी महाराष्ट्रातील जनतेचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. माझे सहकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मंत्रिमंडळाच्या नेतृत्त्वात आपल्या महाराष्ट्राची ही घौडदौड ही अशीच कायम राहील, असे आश्वासनही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.