नामदेवांच्या कार्याची संमेलनामुळे उजळणी
By Admin | Updated: March 23, 2015 00:56 IST2015-03-23T00:56:20+5:302015-03-23T00:56:20+5:30
घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे संत नामदेवांनी पंजाबमध्ये सातशे वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची उजळणी होणार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.

नामदेवांच्या कार्याची संमेलनामुळे उजळणी
पुणे : घुमान येथे होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामुळे संत नामदेवांनी पंजाबमध्ये सातशे वर्षांपूर्वी केलेल्या कार्याची उजळणी होणार आहे, असे मत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी व्यक्त केले.
संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अण्णांनी आज घुमानला पहिल्यांदाच भेट दिली. साहित्य संमेलनाच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन अण्णांच्या हस्ते करण्यात आले. सरहदचे संस्थापक अध्यक्ष संजय नहार, दत्ता आवाडी, विनायकराव पाटील, बलभीम जगताप त्यांच्या सोबत होते.
अण्णा म्हणाले, ‘‘सातशे वर्षांपूर्वी नामदेवांनी भागवत धर्माची पताका घेऊन पंजाबमध्ये जागृती केली. त्यांच्या कार्यासमोर बादशहालाही नतमस्तक व्हावे लागले. नामदेव महाराजांचा तोच संदेश घेऊन मी येथे आलो आहे. आज पहिल्यांदाच मी घुमानला आलो आहे. हे स्थान स्फूर्तिदायक व प्रेरणादायी आहे. साहित्य संमेलनामुळे पंजाब आणि महाराष्ट्रातील संबंध दृढ होण्यासाठी आणि राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागण्यासाठी निश्चित मदत होईल.’’
अण्णांनी तपियाना गुरुद्वारा साहिब आणि संत नामदेव गुरुद्वाराला भेट देऊन दर्शन घेतले. (प्रतिनिधी)