‘रत्नागिरी गॅस’चा आजचा मुहूर्त हुकणार

By Admin | Updated: November 1, 2015 00:07 IST2015-10-31T23:18:30+5:302015-11-01T00:07:14+5:30

तांत्रिक बाबी अपूर्ण : प्रारंभी ५00 मेगावॅटचे उत्पादन

'Ratnagiri Gas' will hit today | ‘रत्नागिरी गॅस’चा आजचा मुहूर्त हुकणार

‘रत्नागिरी गॅस’चा आजचा मुहूर्त हुकणार

संकेत गोयथळे ल्ल गुहागर
जवळपास दोन वर्षे वीज निर्मिती ठप्प असलेला रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प १ नोव्हेंबरपर्यंत सुरू करण्याची घोषणा केंद्रीय ऊर्जामंत्री पीयूष गोयल यांनी केली असली तरी अजूनही काही तांत्रिक बाबी अपूर्ण असल्याने वीज निर्मितीचा आज, रविवारचा मुहूर्त मात्र हुकणार आहे. प्रकल्प सुरू करण्याची तयारी अंतिम टप्प्यात असून, रेल्वे ५०० मेगावॅट वीज घेणार आहे. मात्र, या प्रकल्पातून वीज घेण्यासाठी रेल्वेला सेंट्रल इलेक्ट्रिसिटी रेग्युलेट्री अ‍ॅथॉरिटीचा (सीईआरसी) परवाना अजून मिळालेला नाही.
महाराष्ट्रावर आलेल्या भारनियमनाचे संकट लक्षात घेऊन कोर्ट रिसीव्हरच्या ताब्यात असलेला दोन हजार १५० मेगावॅट क्षमतेचा एन्रॉनचा दाभोळ वीज प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ५ आॅक्टोबर २००५ मध्ये रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्प सुरू झाला. अनेक वर्षे बंद असल्याने वीज निर्मिती करण्यामध्ये अनेक अडचणी आल्या. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर प्रकल्पातून एक हजार ९०० मेगावॅटपर्यंत तिन्ही टप्प्यांतून वीज निर्मिती करण्यात यश आले होते. त्यानंतर सरासरी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होत असताना अपुऱ्या गॅस पुरवठ्यामुळे अखेर डिसेंबर २०१३ पासून वीज निर्मिती बंद ठेवण्याची नामुष्की कंपनी प्रशासनावर आली. दरम्यान, अनेकवेळा प्रकल्प सुरू होणार अशी चर्चा कायम राहिली. मात्र, प्रत्यक्षात प्रकल्पातून जवळपास दोन वर्षे झाली, तरी वीज निर्मिती होऊ शकलेली नाही.
केंद्र व राज्यातील सत्ता बदलानंतर लगेचच प्रकल्पाबाबत सकारात्मक निर्णय होईल, असे वाटत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्प सुरू होण्यासाठी अनेक अडचणी असल्याचे जाहीर केल्याने आता हा प्रकल्प बंद होणार, असे चित्र निर्माण झाले होते. त्यानंतर पुन्हा एकदा ऊर्जामंत्री गोयल यांनी प्रकल्प सुरू करण्याच्या सकारात्मक हालचाली सुरू असल्याचे जाहीर केले होते. प्रकल्पातील ५०० मेगावॅट वीज रेल्वेला देऊन प्रकल्प १ नोव्हेंबरला सुरू करण्याची घोषणाही त्यांनी महिन्याभरापूर्वीच केली होती.
पंधरा दिवसांपूर्वीच दिल्लीतून रेल्वेकडून १५ अधिकाऱ्यांच्या विशेष समितीने रत्नागिरी गॅस प्रकल्पाला प्रत्यक्ष भेट देऊन सकारात्मक अभिप्राय दिला होता. प्रत्यक्ष वीज निर्मिती करून ती रेल्वेला देण्यासाठी काही तांत्रिक मंजुऱ्यांची गरज आहे. यामध्ये वीजपुरवठा करण्यासाठी रेल्वेकडे सीईआरसीचा परवाना मिळणे गरजेचे आहे. यासाठी रेल्वेने पत्र पाठविले असून, केव्हाही हा परवाना मिळू शकेल व त्यानंतर सरकारतर्फे आम्हाला नोटिफिकेशन आल्यानंतर कोणत्याही क्षणी वीज निर्मिती सुरू होईल, असे प्रकल्पातील एका जबाबदार अधिकाऱ्याने सांगितले.
 

वीज निर्मितीची सज्जता
रत्नागिरी गॅस प्रकल्पाततीन टप्प्यांतून १९५० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता आहे. सद्य:स्थितीत टप्पा एक हा प्रिझर्व्हेशनमध्ये ठेवण्यात आला असून, टप्पा २ व ३ मधून वीज निर्मिती करण्यासाठी संपूर्ण सज्जता ठेवली आहे. या दोन टप्प्यांतून एक हजार मेगावॅट वीज निर्मिती होऊ शकते. मात्र, प्रत्यक्षात ५०० मेगावॅट इतकीच वीज निर्मिती होणार असली, तरी काही कालावधीनंतर या वीज निर्मिती करण्याच्या टर्बाईनचे मेंटेनन्स (डागडुजी) करण्यासाठी काही काळ बंद ठेवावे लागतात. यासाठी दोन्ही टप्प्यांतील टर्बाईनमधून सज्जता ठेवली आहे.

Web Title: 'Ratnagiri Gas' will hit today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.