रेल्वे दरवाढीला सर्वस्तरातून तीव्र विरोध

By Admin | Updated: June 22, 2014 00:58 IST2014-06-22T00:58:43+5:302014-06-22T00:58:43+5:30

केंद्र सरकारच्या रेल्वे दरवाढीच्या निर्णयामुळे देशभरासह नागपुरातही तीव्र असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.

Rapid protests from the allotment to the railway haul | रेल्वे दरवाढीला सर्वस्तरातून तीव्र विरोध

रेल्वे दरवाढीला सर्वस्तरातून तीव्र विरोध

राष्ट्रवादी-आपने नोंदविला निषेध : ‘बुरे दिन’ आल्याची टीका
नागपूर : केंद्र सरकारच्या रेल्वे दरवाढीच्या निर्णयामुळे देशभरासह नागपुरातही तीव्र असंतोष पसरला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम आदमी पार्टीने निदर्शने करीत दरवाढ मागे घेण्याची मागणी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शनिवारी सायंकाळी व्हेरायटी चौकात रेल्वे दरवाढीविरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली. आधीच महागाईने त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांसाठी रेल्वेचा प्रवास महागल्याने त्यांचे जगणे कठीण होणार आहे. त्यामुळे ही दरवाढ मागे घेण्यात यावी.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीआधी नागरिकांना चांगले दिवस आणण्याचे आश्वासन दिले होते. परंतु त्यांनी रेल्वे दरवाढ करून लोकांचा विश्वासघात केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याप्रसंगी केंद्र शासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी करण्यात आली.
नगरसेविका प्रगती पाटील यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात राजेश कुंभलकर, रवी घाटगे, चरणजितसिंग चौधरी, हरविंदरसिंग मुल्ला, प्रशांत बनकर, तनुज चौबे, महेंद्र भांगे, पराग नागपुरे, दिनकर वानखेडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
आम आदमी पार्टी
रेल्वे दरवाढीचा निषेधार्थ आम आदमी पार्टीतर्फे संविधान चौकात निदर्शने करण्यात आली. यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी मोदी सरकार हाय हाय, रेल्वे दरवाढ मागे घ्या, महागाई की मार, बंद करो अत्याचार, ऐसे दिन नही चाहिये आदी नाऱ्यांनी परिसर दणाणून सोडला.
आपचे नेते देवेंद्र वानखेडे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात ज्योती कानेरे, बरकरार अहमद सिद्दीकी, मनोज वरघट, डॉ. अशोक लांजेवार, विक्रांत देशमुख, प्रशांत निलाटकर, गगन बेलिया, कविता सिंघल, पीयूष धापोडकर, अश्विन मोटघरे, सुरेंद्र समुद्रे, जगजितसिंग, सतविंदरसिंग, मनीष भारद्वाज, कृष्णराव धापोडकर आदी सहभागी होते. (प्रतिनिधी)
‘अच्छे नव्हे, बुरे दिन’
मोदी सरकारने रेल्वे अर्थसंकल्पाच्या पूर्वी रेल्वेच्या प्रवासी भाड्यात १४.२ टक्के आणि मालभाड्यात ६.५ टक्के वाढ करून नागरिकांना महागाईच्या खाईत लोटले आहे. गेल्या दशकातील ही सर्वात मोठी भाडेवाढ आहे. याचा सर्वसामान्य नागरिकांना मोठा फटका बसणार आहे. जनतेला विकासाची स्वप्न दाखवून सत्ता काबीज केल्यानंतर ‘अच्छे दिन आयेंगे’ अशी दिशाभूल मोदी सरकारने केली. परंतू प्रत्यक्षात मात्र पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने त्रस्त नागरिकांवर रेल्वे प्रवास भाड्याचे ओझे लादले.’
डॉ. अनिस अहमद, माजी मंत्री
ही तर रेल्वे प्रवाशांची पिळवणूक
‘महागाई आणि भ्रष्टाचाराच्या मुद्यावर मोदी सरकारने निवडणूक जिंकली. भारतात सर्वाधिक प्रवासी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. मोदी सरकारने रेल्वे प्रवासी भाड्यात केलेली १४.२ टक्के वाढ खूप मोठी आहे. या भाडेवाढीचा रेल्वे प्रवाशांना फार मोठा फटका बसणार आहे. मोदी सरकारने निवडणुकीत दिलेले महागाई कमी करण्याचे आश्वासन पाळले नसून सर्वसामान्य नागरिकांची या भाडेवाढीच्या रूपाने फसवणूक केली आहे.’
अजय पाटील,
शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस
अर्थसंकल्पापूर्वी भाडेवाढ नको होती
‘शासनाने अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच रेल्वे प्रवासभाड्यात वाढ करावयास नको होती. रेल्वेमंत्र्यांनी उत्पन्नाच्या इतर स्रोतांवर लक्ष केंद्रित करून त्याबाबत निर्णय घ्यावयास हवा होता. परंतु त्यांनी सर्वात सोपा मार्ग निवडून भाडेवाढ केली. यामुळे व्यापारी, सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडणार आहे.
दीपेन अग्रवाल, अध्यक्ष, नाग विदर्भ चेंबर आॅफ कॉमर्स
महागाई वाढविणारा निर्णय
‘विकासाचे स्वप्न दाखवून मोदी सरकार सत्तेत आले. परंतु सत्तेत येताच डिझेलचे दर आणि आता रेल्वे प्रवासभाडे वाढले. हा निर्णय सामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी नुकसानदायी आहे. यामुळे महागाई आणखी वाढणार आहे. हा अन्यायकारक निर्णय शासनाने परत घेण्याची गरज आहे.
अतुल कोटेचा, सदस्य,
रेल्वे उपभोक्ता सल्लागार समिर्ती
बाजारात येऊ शकते मंदी
‘अच्छे दिन आनेवाले है, अशी घोषणा करणाऱ्या शासनाने रेल्वे अर्थसंकल्पापूर्वीच प्रवासभाड्यात वाढ केली. वाढती महागाई, मान्सून याकडे लक्ष देऊन शासनाने दरवाढ करणे चुकीचे आहे. यामुळे महागाई वाढून बाजारात मंदी येऊ शकते.’
कैलास जोगानी, अध्यक्ष नागपूर चेंबर आॅफ कॉमर्स
उद्योगांपुढील संकट वाढणार
‘रेल्वे प्रवासभाडे आणि माल वाहतुकीच्या दरातील वाढ याचा बाजारावर विपरीत परिणाम पडणार आहे. औद्योगिकदृष्ट्या ही ेवाढ नुकसानदायी ठरणार आहे. आधीच विदर्भातील उद्योग संकटात असून या निर्णयामुळे उद्योगांपुढील संकट वाढणार आहे.
प्रफुल्लभाई दोशी,
अध्यक्ष विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन
शासनाने सुविधा, सुरक्षा देण्याची गरज
‘शासनाने सुविधा, सुरक्षा वाढवून प्रवासभाड्यात वाढ केली असती तर कुणालाच काही विरोध करण्याचे कारण नव्हते. परंतु एकमुश्त प्रवासभाडे आणि मालवाहतुकीच्या दरात वाढ केल्यामुळे महागाई वाढणार आहे.’
जे. पी. शर्मा,
अध्यक्ष विदर्भ टॅक्सपेयर्स असोसिएशन

Web Title: Rapid protests from the allotment to the railway haul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.