राणेंच्या भूमिकेवर तोडगा?
By Admin | Updated: July 21, 2014 03:31 IST2014-07-21T03:31:56+5:302014-07-21T03:31:56+5:30
ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.

राणेंच्या भूमिकेवर तोडगा?
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील काँग्रेसमध्ये बदलाची शक्यता पूर्णपणे मावळली असताना उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर रविवारी सायंकाळी अचानक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण पुन्हा तापले. ही बैठक जवळपास ४० मिनिटे चालली. राणे यांच्या नाराजीवर गंभीरपणे पक्षांतर्गत चर्चा सुरू असून त्यातून अजूनही सन्मान्य तोडगा निघू शकेल, असे संकेत मिळू लागले आहेत.
सूत्रांनी सांगितले, की सोनियांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांची स्वतंत्रपणे भेट घण्याच्या सूचना त्यांना देण्यात आल्या होत्या. सुशीलकुमार शिंदे यांनी अॅण्टोनी समितीपुढे स्वतंत्रपणे आपले मत मांडले होते. आता पुन्हा त्यांना काँग्रेस श्रेष्ठींनी बोलविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र चव्हाण यांच्या निकटच्या सूत्रांनी सांगितले, की मुख्यमंत्र्यांबाबत कोणतीच चर्चा नसून, नाराज राणे यांच्या भूमिकेनंतर राज्यातील काँग्रेसच्या स्थितीवर चर्चा हाच विषय होता.
काँग्रेस सूत्रांनी सांगितले, की सोमवारी नारायण राणे पक्ष नव्हे, तर मंत्रिपद सोडणार आहेत. पक्षात चैतन्य आणण्याची तयारी सुरू असताना या भूमिकेमुळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात गेल्या तीन दिवसांत पक्षाच्या प्रतिमेला धक्का बसत आहे,
त्यावर या बैठकीत चर्चा झाली.
राणेंची नाराजी दूर कशी करता येईल, याची रणनीती ठरविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. राणे यांचे समर्थक शिवसेनेत गेल्याने त्यांच्या या नव्या
राजकीय चालीला किती ताकद द्यावी, यावरही विचार होत आहे. राणेंची व्यूहनीती कशी असेल, ते राजकीय संघटना काढून पक्षापुढे आव्हान उभे करतील का, पक्षातील नेत्यांना ते लक्ष्य बनविणार आहेत का असे सर्व प्रश्न चर्चेला होते. पण प्रत्यक्षात राणे यांनी पक्ष सोडण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत, किंबहुना आपण काँग्रेसमध्येच आहोत, असे स्पष्ट केले आहे. राणेंनी काँग्रेसच्या पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या ए.के. अण्टोेनी समितीसमोर जे मुद्दे मांडले होते, त्याची उजळणी करण्यात आली. त्यामुळेच त्यांची भूमिका आणि मते गंभीरपणे घेऊन त्यावर तोडगा काढण्यासाठी पक्षांतर्गत खल सुरू असल्याचे स्पष्ट होत आहे.
काँग्रेसच्या विभागवार होणाऱ्या बैठकी २६ जुलैपर्यंत संपवा असे सूचित करण्यात आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक आघाडी करण्याचा प्रस्ताव आलेला आहे. मात्र कार्यकर्त्यांची इच्छा जाणून घेतल्यावरच २६ जुलैनंतर वाटाघाटी करावयाच्या की स्वतंत्र लढायचे ते ठरेल,यावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)