उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनी आज ठाकरे गट सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. एकनाथ शिंदेंसोबत झालेल्या बैठकीनंतर साळवींनी ठाकरे शिवसेना पक्ष का सोडला, कोणामुळे सोडला याचे कारण सांगितले आहे.
२०२४ चा पराभव माझ्या जिव्हारी लागला असल्याचे साळवी म्हणाले. या निवडणुकीत माझ्या पक्षातीलच नेत्यांनी माझ्या विरुद्ध काम केले. विनायक राऊत हेच माझ्या पराभवाला कारणीभूत आहेत. त्यांच्यामुळे मी पक्ष सोडत आहे, असे साळवी यांनी आज जाहीर केले. विनायक राऊत यांनी माझ्याविरोधात काम केल्याचा गंभीर आरोप साळवी यांनी केला आहे.
सामंत बंधू आणि साळवी वादावरही साळवी यांनी त्यांच्यात झालेला समझोता स्पष्ट केला. एकनाथ शिंदे यांनी आम्हाला तिघांना सुद्धा समजवून सांगितलं की, ही शिवसेना आपल्याला वाढवायची आहे, यामुळे आमच्यातील वाद मिटविण्यात आल्याचे साळवी म्हणाले. माझ्या मतदारसंघातील माणसांना न्याय द्यायचा असेल तर मला योग्य तो निर्णय घेतला पाहिजे असं मी बोललो होतो, त्यामुळे आता मी योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.
कोणत्याही चौकशीला आम्ही घाबरत नाही, तेव्हाही मी घाबरलो नाही. आताही मी घाबरत नाही. चौकशी केली तरी मी सहकार्य करेन आणि मला खात्री आहे मी निर्दोष असेन. जेव्हा निवडणूका असतात तेव्हा आरोप होत असतात, असेही साळवी यांनी स्पष्ट केले.