कल्याण - मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कल्याण आणि डोंबिवलीच्या दौऱ्यावर आहेत. शहरातील विविध समस्यांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांची कल्याण डोंबिवली महापालिकेत भेट घेतली. कामं होत नसल्याची तक्रार मनसे नगरसेवकांनी केली होती. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे केडीएमसीच्या आयुक्तांच्या भेटीसाठी गेले होते. यावेळी मनसेचे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष पारकर, राजू पाटील, राजेश कदम, महापालिकेतील विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेविका कस्तुरी देसाई, तृप्ती भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
शहरातील विविध मुद्यांवरुन यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना फैलावर धरले. फेरीवाल्यांवरील कारवाई अधिक परिणामकारकपणे होण्यासाठी आपण स्वतः जातीने लक्ष घातले पाहीजे. केवळ खालील अधिकाऱ्यांवर ती जबाबदारी सोपवून फेरीवाले हटणार नाहीत, असं सांगत ही शहरं आपल्याला साफ हवीत की नको? शहर स्वच्छ कधी करणार?, असा सवाल यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांना विचारला. तसेच कल्याण-डोंबिवलीतील फेरीवाल्यांविरोधात कारवाई का होत नाही, असा सवालही यावेळी त्यांनी आयुक्तांना विचारला. फेरीवाल्यांना जास्तीत जास्त दंड आकाराल्यास त्यांचे वारंवार बसणे कमी होईल. रेल्वेने रेल्वेच्या हद्दीत कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यानुसार महापालिकेनं महापालिकेच्या हद्दीत कारवाई करावी,अशी मागणीही यावेळी राज ठाकरे यांनी आयुक्तांकडे केली. सोबत, रेल्वेची हद्द आणि पालिकेची हद्द एकदाच निश्चित करण्याचीही मागणीही राज यांनी केली.
मनसे नगरसेवकांच्या मागण्या- महापालिकेने डोंबिवलीतील बालभवनातील पै फ्रेंण्डस लायब्ररीला चालवण्यास द्यावी.
- कला क्रीडा विभाग बंद केला आहे, तो सुरु करावा.
- सकाळच्या वेळेत डोंबिवली पूर्व व पश्चिमेतून बसेस जास्त प्रमाणात सोडव्यात. त्याचबरोबर खंबाळपाडा बस डेपो सुरू करण्यात यावा.
- 27 गावे महापालिकेत आल्यावर त्यांच्या हद्दवाढी पोटी सरकारकडून निधी मिळवून विकास कामे करण्यात यावीत.
- मोहने परिसरातील बंद असलेले शौचालय तातडीने सुरु करण्यात यावे.
- आरक्षित भुखंडावरील अतिक्रमण हटवून फेरीवाल्यांसाठी असलेल्या आरक्षित जागेवर फेरीवाल्यांना बसवावे
दरम्या, यासंदर्भात लवकर निर्णय घेतले जातील, अशी ग्वाही आयुक्त पी वेलारासू यांनी राज ठाकरे यांना दिली आहे.