MNS Protest: पहिली इयत्तेपासून राज्यात तिसरी भाषा म्हणून हिंदी भाषा शिकविण्याच्या राज्य सरकारच्या सक्तीविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. ६ जुलै रोजी गिरगाव चौपाटीवरून हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे राज ठाकरे यांनी केली आहे.
या मोर्चाला कोणताही झेंडा नसणार आहे. फक्त मराठी हाच या मोर्चाचा अजेंडा असणार आहे, असे राज म्हणाले. तसेच राज यांनी या हिंदी सक्तीविरोधात सर्व राजकीय पक्षांनी या सामील व्हावे असे आवाहन केले आहे. राज्यातील प्रत्येक मराठी माणसाने मोर्चात सामील व्हावे असेही राज ठाकरे म्हणाले आहेत.
हिंदी किंवा इतर भाषेची सक्ती मी होऊ देणार नाही. जे शिक्षण तज्ञ, भाषा तज्ञांनी बोलणार आहे, त्यांना माझे पत्र जाईल. सर्व विद्यार्थ्यांना, पालकांना आम्ही बोलविणार आहोत. सरकारला जनतेच्या मनात काय आहे समजायला हवे. रविवार अशासाठी निवडला कारण विद्यार्थी पालकांना यायला जमणार आहे. हा कट आहे त्याविरोधात सर्व मराठी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे.
मनसेकडून जाहीर झालेले असले तरी या मोर्चाचे नेतृत्त्व कोणताही पक्ष नाहीय, तर मराठी माणूस करणार असल्याचेही राज यांनी स्पष्ट केले आहे. एवढेच नाही तर राज ठाकरे यांनी मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचे आहे, असा गर्भित इशाराही दिला आहे. राज ठाकरे यांचा हा इशारा कोणासाठी आहे याची चर्चा आता रंगणार आहे.
इशारा कोणाला...
राज यांनी राजकीय पक्ष, कलावंतांना हा इशारा दिल्याचे समजते आहे. अनेक राजकीय पक्षांनी हिंदी सक्तीवरून सरकारवर टीका केली आहे. त्या पक्षांचे प्रमुख नेते या मोर्चामध्ये येणार का, हे पाहावं लागेल. तसंच, काही कलाकारांनी यावर चकार काढलेला नाही. ते काय भूमिका घेतात, हेही ६ जुलैला समजेल.
शिक्षणतज्ञांची भूमिका काय...
१७ जूनचा 'अनिवार्य' शब्द वगळून सुधारित निर्णय शासनाने केला आहे. या निर्णयात 'रोगापेक्षा इलाज भयंकर' अशा प्रकारचा मजकूर आहे. सुधारित निर्णयात पहिलीपासून तिसरी भाषा लादण्याचा शासनाचा इरादा पक्का असल्याचे प्रतीत होते, अशी खरमरीत टीका डॉ. दीपक पवार (मराठी अभ्यास केंद्र), शिक्षणतज्ज्ञ रमेश पानसे (ग्राममंगल), चिन्मयी सुमित (मराठी शाळांच्या सदिच्छादूत), गिरीश सामंत (शिक्षण अभ्यासक), भाषा अभ्यासक प्रकाश परब, लेखक कवी डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी (महाराष्ट्र सांस्कृतिक आघाडी), कौतिकराव पाटील (मराठवाडा साहित्य परिषद), किशोर दरक, आदी शिक्षणतज्ज्ञांनी केली आहे.