काँग्रेसच्या आत्मघाती कृत्यांनी राहुल यांचा घात

By Admin | Updated: May 31, 2014 05:16 IST2014-05-31T05:16:41+5:302014-05-31T05:16:41+5:30

२००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडी पुन्हा सत्तेवर आली. पुन्हा मनमोहन सिंग यांच्याकडे पंतप्रधानपद देण्यात आले. पण पुढच्या पाच वर्षांत कधीतरी राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यात येईल,

Rahul's assassination by Congress suicidal act | काँग्रेसच्या आत्मघाती कृत्यांनी राहुल यांचा घात

काँग्रेसच्या आत्मघाती कृत्यांनी राहुल यांचा घात

खा. विजय दर्डा, २००९ साली संयुक्त पुरोगामी आघाडी पुन्हा सत्तेवर आली. पुन्हा मनमोहन सिंग यांच्याकडे पंतप्रधानपद देण्यात आले. पण पुढच्या पाच वर्षांत कधीतरी राहुल गांधींना पंतप्रधान बनवण्यात येईल, अशी भावना राजकीय वर्तुळात होती. तिसर्‍या टर्मला मनमोहन सिंग मैदानात नसतील. त्यामुळे त्या आधीच राहुल गांधींना आणले जाईल, असा अंदाज बांधला जात होता. पण काँग्रेस हायकमांडच्या मनात काही वेगळे होते. मनमोहन सिंग यांच्या जागी राहुल गांधींना आणण्यात अति खबरदारी घेण्याच्या वृत्तीमुळे सोळाव्या लोकसभेची निवडणूक घोषित झाली, तेव्हा समोर नरेंद्र मोदींसारखा मजबूत उमेदवार भाजपाने उभा केला होता. संधी असतानाही पंतप्रधानपद टाळणारे राहुल गांधी व भाजपाचा मजबूत उमेदवार, असा हा विषम सामना होता. ‘सत्ता हे विष आहे’ असे राहुल गांधी बोलले होते. सकारात्मक अर्थाने ते बोलले. पण त्यातून ते राजकारणात पुढे यायला अनुत्सुक आहेत, असा समज पसरला. केवळ एक-दोन कारणांमुळे लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे पानिपत झाले आणि २०६ जागांवरून काँग्रेस ४४ जागांवर आली, असे होऊ शकत नाही. पराभवाला आणखीही कारणे आहेत. पराभवासाठी काँग्रेस स्वत:च जबाबदार आहे. काँग्रेस पक्ष व सरकारने असंख्य चुका केल्या. ‘हिट विकेट’ झाले. झालेल्या चुकांपासून धडा घ्यायला पक्ष तयार नव्हता. मतदानाचे पाच (पान ७ वर) (पान १ वरून) टप्पे आटोपले तेव्हाही ही आत्मघाती प्रवृत्ती सुरूच होती. महिलेवर पाळत ठेवण्याच्या प्रकरणात चौकशीसाठी मतमोजणीच्या तारखेआधी सरकार एका न्यायमूर्तीची नेमणूक करील, असे दोघा ज्येष्ठ मंत्र्यांनी सांगितले. निकालाला काही दिवस उरले असताना चौकशी आयोग बसवणे बरोबर नाही, हे समजायला फार मोठा अनुभव गाठीशी लागतो अशातला भाग नाही. हे पाऊल राजकीय सूड उगवण्यासारखे होणार होते. सरकारवर टीका झाली. नंतर तो विचार मागे घेण्यात आला. २ जी टेलीकॉम घोटाळा असो की कोलगेट असो, की आदर्श घोटाळा असो, चुकीच्या पद्धतीने हे विषय हाताळण्यात आले. अण्णा हजारे आणि बाबा रामदेव यांच्या नेतृत्वातील भ्रष्टाचारविरोधी चळवळ आणि त्या संबंधीचे लोकपाल विधेयक, तेलंगणा राज्याच्या निर्मितीत लावलेला विलंब, वेगळ्या विदर्भाच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष, महागाई रोखण्यात आलेले अपयश आणि धोरणलकवा हे प्रश्न व्यवस्थित हाताळले गेले नाहीत. उलट ते अधिक किचकट करून ठेवले गेले. ‘कलंकित खासदारांना अभय देणारा वटहुकूम कचर्‍याच्या पेटीत फेकून दिला पाहिजे,’ या राहुल गांधी यांच्या भूमिकेने पक्षाला विशेष फायदा झाला नाही. स्वत:च स्वत:ची विकेट गमावून बसण्यासाखे हे होते. पुन्हा तोच प्रश्न आम्हा सर्वांना पडतो. यापेक्षा अधिक चांगले पर्याय सहज उपलब्ध असताना आपण असे का वागतो? अपयशाची मालिका लांबलचक आहे. परिणाम असा झाला की, काँग्रेस पक्ष आणि सरकार यांच्या विश्वासार्हतेपुढे प्रश्नचिन्ह लागले. त्यातून सरकारबद्दल नकारात्मक मत तयार होऊ लागले. पंतप्रधान दुबळे वाटले. ते निर्णय करू शकत नव्हते आणि पक्षाचे नेतृत्व राजकीय लढाई लढायला अक्षम होते. पराभवानंतरच्या चर्चेत संपर्काचा अभाव असा एक शब्द वारंवार येतो आहे. संपर्काचा अभाव म्हणजे हेच ते. हे कमी झाले म्हणून की काय, काँग्रेसने अशा काही गोष्टी केल्या की अडचणी वाढल्या. समाजाच्या जवळपास प्रत्येक घटकापासून काँग्रेस दूर जाऊ लागली. कार्पोरेट क्षेत्र, मीडिया आणि नोकरशाही हे प्रभावशाली घटक आहेत. ही तिघंही काँग्रेसच्या विरोधात गेली. याच्या आधी असे कधीही झाले नव्हते. गरीब आणि मध्यमवर्गीय आधीपासून संत्रस्त होते. आपल्याकडे काँग्रेसचे दुर्लक्ष झालंय, अशी त्यांची भावना झाली होती. लोकांना बदल हवा होता. काँग्रेस सरकारच्या तडाख्यातून कधी सुटतो याची हे सर्व घटक जणू वाट पाहात होते. आपला पराभव होणार, संख्याबळ घटणार याची काँग्रेसने जणू मनाची तयारी केली होती. किमान तो सन्मानजनक पद्धतीने व्हावा अशी धडपड सुरू होती. पण झालेला पराभव धक्कादायक आहे. काँग्रेसने या आधी असा मार खाल्ला नव्हता. भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेत तरुण पिढीचे जसे सहकार्य होते तसेच व्यावसायिक समाजानेही भाजपाला मदत केली. रा. स्व. संघाचे स्वयंसेवक, भाजपाची युवा शाखा तसेच महिला शाखाही प्रचारात सक्रियरीत्या सहभागी झाल्या होत्या. त्या सर्वांच्या सहकार्याने ही निवडणूक त्यांनी लढविली. त्याचा फायदा भाजपाला मिळाला. काँग्रेसमध्ये मात्र याच्याविरुद्ध स्थिती होती. काँग्रेसच्या प्रचार मोहिमेत तरुण किंवा महिला कुठेही दिसल्या नाहीत. काँग्रेसचा दारुण पराभव होण्यासाठी ही कारणेही कारणीभूत ठरली होती. भाजपाच्या विजयात डावपेचांचाही भाग होता. या वेळी भाजपाला सहा पटीपेक्षा अधिक जागा मिळाल्या. भाजपाने ३१ टक्के मते घेतली आणि त्यांना २८२ जागा मिळाल्या. काँग्रेसला फक्त १९ टक्के मते मिळाली आणि काँग्रेस केवळ ४४ जागा खेचू शकली. आपल्या निवडणूक पद्धतीचा लाभ विजेत्यांना होतो. पण मतदानातून अधिक जागा मिळविणे, हा भाजपाच्या डावपेचाचा भाग होता. मतदारसंघनिहाय नियोजन केले असते तर काँग्रेसचे नुकसान कमी होऊ शकले असते. पण काँग्रेसमध्ये एवढी फूट होती की, चांगल्याची अपेक्षा करायची सोय नव्हती. खुद्द राहुल गांधींच्या टीममध्ये मतभेद असल्याचे आता समोर येत आहे. या टीमचे एक प्रमुख सदस्य मिलिंद देवरा तसे बोलले आहेत. पराभव कितीही मोठा असो, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल यांचे नेतृत्वगुण त्याला हिसकावून घेता येणार नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. या दोघांची लोकांमधली विश्वासार्हता कायम आहे. सर्वच बाबतीत हे महान नेते आहेत. हे दोघे आणि जोडीला प्रियंका असे हे तिघे काँग्रेसला पुन्हा एकदा विजयाच्या मार्गावर नेऊ शकतात. पण त्यासाठी आपल्याच माणसांचे पाय ओढण्याची खोड काँग्रेसजनांना सोडावी लागेल. आत्मघाती विचार बदलावे लागतील. गांधी परिवाराच्या त्याग आणि पुण्याईच्या जोरावर आपण पुन्हा सत्तेत येऊ, या भ्रमात मात्र काँग्रेसजनांनी राहता कामा नये. पराभवाला विजयात बदलायचे असेल तर काँग्रेसजनांना आपली मानसिकता बदलावी लागेल. स्वत: परिश्रम करावे लागतील. (क्रमश:)

Web Title: Rahul's assassination by Congress suicidal act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.