इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली
शालेय शिक्षणमंत्र्यांकडून गुणवंतांचे कौतुक
पालक भारावले : राजेंद्र दर्डा यांचे दहावी आणि बारावीच्या ७,६२३ विद्यार्थ्यांना पत्र
मुंबई : इयत्ता दहावी आणि बारावीच्या ७ हजार ६२३ गुणवंतांना अभिनंदनाचे पत्र लिहून शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी कौतुकाची थाप दिली. प्रचंड मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्ही हे यश मिळविले आहे. पालक, शिक्षक आणि शाळेसाठी हा क्षण अभिमानाने भारावून जाणारा आहे. तुमच्यासारखे विद्यार्थी हेच महाराष्ट्राचे खरे रत्न असल्याचे शालेय शिक्षणमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ आणि सीबीएसईच्या दहावी-बारावीत चांगले गुण मिळविणार्या विद्यार्थ्यांना हे पत्र पाठविण्यात आले आहे. दहावीत ९५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्या ५ हजार १८0 आणि बारावीत ९0 टक्क्यांपेक्षा अधिक गुण घेणार्या २ हजार ४४३ विद्यार्थ्यांना हे अभिनंदनाचे पत्र पाठिवले असल्याचे राजेंद्र दर्डा यांनी सांगितले. या पत्रांना पालक आणि विद्यार्थ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. काहींनी मला फोन केले तर, काहींनी पत्राद्वारे उत्तर दिले, काहींनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया दिल्याचे दर्डा यांनी सांगितले. यातील एक उदाहरण सांगताना ते म्हणाले, एआयआयएमएसला प्रवेश निश्चित झालेल्या एका विद्यार्थिनीच्या पालकाला या पत्राने आश्चर्याचा धक्का बसला. पालक म्हणतात, मंत्र्यांकडून असे अभिनंदनाचे पत्र मिळणे, हे आमच्या मुलीच्या जिद्दीला चालना देणारे ठरले. माझ्यासारख्या विद्यार्थ्याचे कौतुक करण्यासाठी शालेय शिक्षणमंत्र्यांनी वेळ काढल्याने मी प्रचंड आनंदी झालो आहे, असे ठाणे शहरातील अभिषेक म्हणाला.
अशी सुचली कल्पना.. ही कल्पना कशी सुचली, याबाबत शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा म्हणाले, बारावीत ९६ टक्के गुण घेतलेला एक गुणवंत विद्यार्थी मुंबईच्या कार्यालयात मला भेटायला आला होता. मी त्याला विचारले, 'मेरिट'मध्ये आल्यामुळे तुझे खूप कौतुक झाले असेल. तेव्हा तो काहीशा निराशेने म्हणाला, माझ्या आईला यातले काही कळत नाही आणि वडील सकाळीच मजुरीला निघून जातात. शेजार्यांना फारसे काही वाटत नाही. त्याच्याप्रमाणेच अनेक विद्यार्थी असे कौतुकापासून दूर असतील, असे मला वाटले व त्यातूनच त्यांचे कौतुक करण्याची कल्पना सुचली. शिवाय गुणवंतांचे राज्य शासनाकडून कौतुक होत असल्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेल. महाराष्ट्रात मोठे टॅलेंट आहे. या कौतुकामुळे ते अधिक बहरेल, असे मला वाटते, असे त्यांनी सांगितले.
(प्रतिनिधी)
Web Title: Quality appreciation from school teachers