पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ?
By Admin | Updated: May 31, 2014 22:19 IST2014-05-31T20:12:14+5:302014-05-31T22:19:22+5:30
विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे.

पुणे विद्यापीठातील अभियांत्रिकीची ऑनलाईन परीक्षा बंद होणार ?
पुणे : पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ५० गुणांची ऑनलाईन व ५० गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते. परंतु, विद्यापीठाने ५० गुणांची ऑनलाईन परीक्षा बंद करावी, अशी मागणी स्वत: विद्यार्थी,अभियांत्रिकी विद्याशाखेचे काही प्राध्यापक व विद्यापीठ अधिकार मंडळाच्या ज्येष्ठ सदस्यांकडूनही केली जात आहे. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा बंद करण्याबाबत विद्यापीठातर्फे विचार केला जाणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
विद्यापीठातर्फे कला, वाणिज्य, विज्ञान आदी अभ्यासक्रमांसाठी ८०/२०चा पॅटर्न राबविला जात आहे. एकट्या अभियांत्रिकी विद्याशाखेसाठी ५०/५०चा पॅटर्न सुरू आहे. परंतु,त्यामुळे सुमार दर्जाचे विद्यार्थी तयार होत आहेत. तसेच ऑनलाईन परीक्षा पद्धतीसुद्धा सदोष आहे. विद्यार्थ्यांना गुगल किंवा इतर संकेतस्थळांवरून विविध प्रश्नांची उत्तरे सहज सापडतात. ऑनलाईन परीक्षेसाठी ऑनलाईन कॉपीची सुविधाच उपलब्ध आहे. त्यामुळे विद्यापीठाने ऑनलाईन पद्धत बंद करावी, अशी मागणी अधिसभेत करण्यात आली होती. अभियांत्रिकीच्या अनेक विद्यार्थ्यांनी सा करून ऑनलाईन परीक्षा बंद करावी, या मागणीचे निवेदन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांना दिले आहे.
विद्यापीठाचे माजी अधिसभा सदस्य डॉ. अतुल बागुल यांनी पुढाकार घेऊन अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. बागुल म्हणाले, विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेपूर्वी एक आठवडा अगोदर सर्व प्रश्न मिळत आहेत. अनेक विद्यार्थ्यांना एकसारखी ऑनलाईन प्रश्नपत्रिकाही सोडवण्यास मिळत आहे. विद्यार्थी नापास होऊ नयेत आणि महाविद्यालयांना शुल्क मिळत रहावे, या उद्देशानेच ऑनलाईन परीक्षेचा घाट घातला जात आहे. परंतु, या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांना पायाभूत ज्ञान मिळत नाही. परिणामी विद्यापीठातून सुमार दर्जाचे विद्यार्थी निर्माण होत असून त्यांना नोकर्या मिळविणेसुद्धा कठिण जाणार आहे.
विद्या परिषदेत मांडणार भूमिका : अडसूळ
अभियांत्रिकी प्रवेशाच्या पात्रतेच्या निकषात बदल करण्यात आला. त्यामुळे कमी टक्के गुण असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा प्रवेश मिळू लागला. त्यात विद्यापीठातर्फे घेतल्या जाणार्या ऑनलाईन परीक्षेमुळे सुमार दर्जाचे विद्यार्थी तयार होत आहेत. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांना कोणतेही कौशल्य मिळत नाही. विद्यापीठातर्फे पारंपरिक अभ्यासक्रमांना ८०/२०चा पॅटर्न राबविला जात असताना केवळ अभियांत्रिकीला ५०/५० चा पॅटर्न का?, असा सवाल विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ.अरूण अडसूळ यांनी उपस्थित केला असून ३ जून रोजी होणार्या विद्या परिषदेच्या बैठकीत सविस्तर भूमिका मांडणार असल्याचेही त्यांनी सांगितले.