मलंग पट्ट्यातील गावांत आता पक्के रस्ते
By Admin | Updated: June 9, 2016 04:30 IST2016-06-09T04:30:16+5:302016-06-09T04:30:16+5:30
तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत.

मलंग पट्ट्यातील गावांत आता पक्के रस्ते
कल्याण : तालुक्यातील ग्रामीण भागात मोडणाऱ्या मलंगगड पट्ट्यातील गावांमध्ये अंतर्गत रस्ते तयार केले जाणार आहेत. ग्रामविकास निधीतून होणाऱ्या या कामांचा प्रारंभ खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेनेचे कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जलसंवर्धन कामाची पाहणी करण्यात आली. मलंगगडाच्या पायथ्याशी एक लाख लीटर क्षमतेच्या आॅस्ट्रेलियन पद्धतीने बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटनही डॉ. शिंदे यांच्या हस्ते झाले. टाकीची एक पाइपलाइन संपूर्ण गावातून फिरवण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक घरासमोर नळ देण्यात आला आहे.
खासदार निधीतून मलंगवाडी, नेवाळीपाडा, चिंचवली, कुंभार्ली, काकडवाल, मांगरूळ, आंभे, उसाटणे, पोसरी, खरड येथे बोअरवेल खोदून त्यात मोटार व हातपंप बसवण्यात आले आहेत. तसेच, नेवाळी व मलंगगड येथील भेंडीचापाडा येथे पाण्याच्या टाक्या बांधण्यात आल्या आहेत.
नेवाळीपाडा, उसाटणे येथील तलावांची खोली वाढवून गाळ काढण्याची कामे सुरू आहेत. काकडवाल, चिंचोली, आंभे, कुशवली, कुंभार्ली, पोसरी या गावांजवळील वन व पाटबंधारे यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व बंधाऱ्यांमधील गाळ काढून त्यांच्या खोलीकरणाचीही कामे सुरू आहेत. या कामांची पाहणीही यावेळी करण्यात आली. याप्रसंगी वनविभागाचे बदलापूरचे परिक्षेत्र वन अधिकारी चंद्रकांत शेळके, शिवसेनेचे अंबरनाथ तालुकाप्रमुख अशोक म्हात्रे, उपतालुकाप्रमुख रामचंद्र मढवी, नेवाळीचे सरपंच चैनू जाधव, विभागप्रमुख जितेंद्र पाटील, अंकुश पाटील, हिरामण जाधव, विजय जोशी आदी उपस्थित होते.
ठाणे जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी उदय चौधरी आणि ठाण्याचे उपवनसंरक्षक किशोर ठाकरे यांच्यासमवेत बैठक घेऊन जलसंवर्धनाचे कार्यक्र म मोठ्या प्रमाणावर राबवण्याबाबत चर्चा करून आराखडा तयार केला होता. वनविभागाने १५ वर्षांपूर्वी बांधलेल्या बंधाऱ्यांमधील गाळ काढण्याचा आग्रह डॉ. शिंदे यांनी धरल्यानंतर वनविभागाने ते कामे सुरू केले आहे.
मलंगगड परिसरातील पाणीटंचाई लक्षात घेऊन या परिसरात माथा ते पायथा पद्धतीने पाणी अडवण्याच्या व जिरवण्याच्या उपाययोजनांचा आराखडा तयार करण्यास वनविभागाला सांगितले होते. ते अंतिम टप्प्यात आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी लागणारा निधी जिल्हा नियोजन समितीद्वारे मिळण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.
>बोहोनोली, मलंगवाडी येथे
केले वृक्षारोपण
मृगनक्षत्राचे औचित्यसाधून बोहोनोली आणि मलंगवाडी येथे वनविभागाच्या जागेत वृक्षारोपण करण्यात आले. स्थानिक प्रजातीची झाडे आणि फळझाडांचे येथे प्रामुख्याने रोपण करण्यात आले आहे. येथील संपूर्ण टेकडी हिरवीगार करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.