संस्काराचे मोती प्रवेश अर्जाचे प्रकाशन
By Admin | Updated: June 29, 2014 00:51 IST2014-06-29T00:51:11+5:302014-06-29T00:51:11+5:30
लोकमत आणि लोकमत समाचारतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित १०० दिवसांच्या सामान्य ज्ञानाच्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात लवकरच करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेघे ग्रुप आॅफ

संस्काराचे मोती प्रवेश अर्जाचे प्रकाशन
१ जुलैपासून प्रकाशित होणार साहित्य : विजेत्यांना विमान प्रवासाची संधी
नागपूर : लोकमत आणि लोकमत समाचारतर्फे विद्यार्थ्यांसाठी आयोजित १०० दिवसांच्या सामान्य ज्ञानाच्या शैक्षणिक कार्यक्रमाची सुरुवात लवकरच करण्यात येत आहे. यावर्षीच्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेघे ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूशन्सचा उपक्रम असलेली एडीसीसी अकॅडमी आहे. या कार्यक्रमाच्या प्रवेश अर्जाचे प्रकाशन आज एडीसीसी इन्फोकॅड प्रा.लि.चे महासंचालक समीर मेघे आणि एडीसीसी अकॅडमी प्रा.लि.चे महाव्यवस्थापक क्षितिज राज यांच्या हस्ते करण्यात आले. लवकरच या प्रवेश अर्जांचे वितरण शाळांमध्ये करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या सामान्य ज्ञानाचा स्तर उंचावण्याच्या उद्देशाने या दोन्ही स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. लोकमततर्फे ‘संस्काराचे मोती’ शिक्षण सामग्रीचे प्रकाशन १ जुलै ते ११ आॅक्टोबरदरम्यान करण्यात येईल. हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र आणि गोव्यात चालविण्यात येतो. यात पहिली ते दहावीपर्यंत शिकणारे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. लोकमत समाचारतर्फे ‘बबलू, बबली की पाठशाला : ग्रीन किड्ज’चे संचालन नागपूर आवृत्तीत करण्यात येते. यावर्षी हा कार्यक्रम छिंदवाडा शहरातही होणार आहे. ‘बबलू, बबली की पाठशाला : ग्रीन किड्ज’चे साहित्य ७ जुलै ते १८ आॅक्टोबरपर्यंत प्रकाशित होईल. दोन्ही कार्यक्रमात दरवर्षी लाखो विद्यार्थी सहभाग नोंदवून ज्ञान मिळविण्यासोबतच अनेक पुरस्कारही जिंकतात.
या कार्यक्रमात १०० दिवसापर्यंत पर्यावरण, ग्लोबल वार्मिंग, जलवायूतील बदलावर आधारित सामान्य ज्ञानाच्या साहित्याचे प्रकाशन करण्यात येते. प्रत्येक साहित्यासोबत एक छोटे कूपनही प्रकाशित करण्यात येते. हे कूपन प्रवेश अर्जात दिलेल्या ठिकाणी चिकटवायचे आहे. संपूर्ण अर्ज भरल्यानंतर या अर्जाला आपल्या शाळेत किंवा ठरवून दिलेल्या केंद्रात जमा करावे लागणार आहे. जमा झालेल्या कूपनांचा एक ड्रॉ काढून विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात येईल. भाग्यशाली विजेत्यांमधून राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यातील एकाची निवड करून या विद्यार्थ्यांना विमान प्रवासाची संधी देण्यात येणार आहे. याशिवाय प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या विद्यार्थ्यांना एक स्कूल बॅग, वॉटरबॅग आणि लंच बॉक्स देण्यात येईल. प्रत्येक विद्यार्थ्याला पुरस्कार देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क आहे. (प्रतिनिधी)