१५ जूनपर्यंत मदत द्या अन्यथा संघर्ष
By Admin | Updated: June 3, 2015 03:16 IST2015-06-03T03:16:53+5:302015-06-03T03:16:53+5:30
५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सर्वंकष माफी, मराठवाड्यातील फळबागांना वाचविण्यासाठी ३५ हजार हेक्टरी अनुदान,या मागण्यांवर येत्या

१५ जूनपर्यंत मदत द्या अन्यथा संघर्ष
मुंबई : ५० टक्क्यांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाला सर्वंकष माफी, मराठवाड्यातील फळबागांना वाचविण्यासाठी ३५ हजार हेक्टरी अनुदान,या मागण्यांवर येत्या १५ जूनपर्यंत सरकारने निर्णय घेतले नाहीत तर रस्त्यावर उतरुन संघर्ष केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीत दिला.
पवार यांच्या नेतृत्वाखाली प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आदींनी मुख्यमंत्री फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. पवार यांनी मराठवाड्यात ३ दिवस दौरा करून दुष्काळाची नुकतीच पाहाणी केली आहे. या पाहाणीतून समोर आलेले वास्तव त्यांनी मुख्यमंत्र्यासमोर मांडले. शासनाने ठरवून दिलेल्या प्रतिलिटर २० रुपये दराने राज्य सहकारी दुग्ध व्यवसायिकांकडून दूध खरेदी करावे,टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करताना पशुधनाचा विचार करावा, खरीप पिकाचा विमा उतरवलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळावी आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आले. साखरेच्या एफआरपीबाबत निर्णय घेण्यात दिरंगाई होत असल्याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधले. (विशेष प्रतिनिधी)