राज पुरोहितांचे प्रतोदपद धोक्यात?
By Admin | Updated: June 29, 2015 02:37 IST2015-06-29T02:37:57+5:302015-06-29T02:37:57+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांवर तोंडसूख घेणारे भाजपाचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित यांना विधानसभेतील प्रतोदपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे.

राज पुरोहितांचे प्रतोदपद धोक्यात?
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेकांवर तोंडसूख घेणारे भाजपाचे वादग्रस्त आमदार राज पुरोहित यांना विधानसभेतील प्रतोदपद गमवावे लागण्याची दाट शक्यता आहे. मात्र पुरोहित यांच्यावर यापेक्षा कडक कारवाई न करता समज देऊन या प्रकरणावर पडदा पाडण्याच्या हालचाली भाजपात सुरु आहेत.
पुरोहित यांना त्यांचे म्हणणे मांडण्याकरिता पक्षाने नोटीस बजावली असून तीन दिवसांची मुदत दिली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व स्वपक्षीय आमदार मंगलप्रभात लोढा यांना लक्ष्य करणाऱ्या पुरोहित यांना विधानसभेच्या प्रतोद पदावरून दूर केले जाण्याचे संकेत भाजपाच्या एका नेत्याने दिले. पक्षाची प्रतिमा मलिन करणाऱ्या व्यक्तीला प्रतोदपदावर ठेवण्यास आमदारांकडून विरोध केला जाण्याची शक्यता असल्याने तत्पूर्वी पुरोहित यांच्यावर विधिमंडळ पक्षाकडून कारवाई होईल, असे या नेत्याने सांगितले. पुरोहित हे आपल्या बेलगाम वक्तव्यामुळे प्रथम अडचणीत आलेले नाहीत. यापूर्वीही त्यांनी अशा चुका केलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना पक्षातून निलंबित करून विरोधकांच्या हाती कोलीत देण्याची पक्ष नेतृत्वाची इच्छा नाही. समज देऊन हे प्रकरण जेवढ्या लवकर थंड्या बस्त्यात टाकता येईल तेवढे भाजपाचे प्रयत्न सुरु आहेत. पुरोहित यांच्या राजकीय भवितव्यावर या घटनेचा विपरीत परिणाम होणार हे मात्र स्पष्ट दिसत आहे. महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे या सध्या २०० कोटींच्या वादग्रस्त खरेदीमुळे अडचणीत आल्या आहेत. त्याचवेळी राज पुरोहित यांचे स्टींग उघड झाले आहे. भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या पंकजा या कन्या आहेत तर पुरोहित हे कट्टर मुंडे समर्थक आहेत. त्यामुळे पुरोहित यांच्यावर कारवाई केल्यास मुंडे समर्थकांना हेतूत: अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्याची संधी मिळेल, अशी भीती पक्षातील काहींना वाटते. (विशेष प्रतिनिधी)
शिस्तपालन समिती आहे कुठे?
राज पुरोहित यांना प्रदेश भाजपाने शिस्तभंगाकरिता नोटीस बजावली असली तरी प्रत्यक्षात पक्षाची शिस्तपालन समिती कुठे आहे, असा सवाल केला जात आहे. राम नाईक हे दीर्घकाळ महाराष्ट्रातील शिस्तपालन समितीचे अध्यक्ष होते. नाईक हे राज्यपालपदावर नियुक्त झाल्याने नवी समिती नियुक्त केलेली नाही. नवे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी नवे पदाधिकारी जाहीर करताना शिस्तपालन समितीच्या नावांची घोषणा केली किंवा कसे ते पक्षाच्या नेत्यांनाही स्मरत नाही.