बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

By Admin | Updated: December 20, 2014 01:48 IST2014-12-20T01:48:07+5:302014-12-20T01:48:07+5:30

राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल

Promotion of Bamboo Business | बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देणार

नागपूर : राज्यातील बांबू व्यवसायाला उभारी देण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करण्यात येतील. याअंतर्गत खाजगी जमिनीवर बांबू लागवड करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येईल अशी माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. अनिल सोले व नागो गाणार यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. यावर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली.
बांबू व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन बांबू धोरण जाहीर करण्यात आले आहे. खाजगी जमिनीवरील बांबूस वाहतूक पासच्या बंधनातून मुक्त करणे, बांबू क्षेत्रातील उद्योजकांना ई-लिलाव पद्धतीने पारदर्शकरीत्या बांबू पुरवठा करणे तसेच बांबू लागवड व औद्योगिक वापरासाठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करणे यांचा समावेश असल्याचे उत्तरात नमूद करण्यात आले.
ठाणे, पालघर जिल्ह्यात तीन महिन्यात १५६ बालमृत्यू
एप्रिल ते जून २०१४ या कालावधीत ठाणे व पालघर जिल्ह्यामध्ये १५६ बालमृत्यू झाल्याची माहिती राज्य शासनातर्फे देण्यात आली. निरंजन डावखरे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी ही माहिती दिली.
हे सर्व बालमृत्यू कुपोषणामुळे नव्हे तर इतर आजारांमुळे झाले आहेत. या दोन्ही जिल्ह्यांत तीव्र कमी वजनाची १३ हजार ५१४, मध्यम कमी वजनाची ५६ हजार ७४६ बालके आढळून आली होती. परंतु आरोग्य यंत्रणेच्या विस्कळीत कामकाजामुळे त्यांना कुपोषित म्हणता येणार नसल्याचे या लेखी उत्तरात नमूद करण्यात आले आहे.
वनक्षेत्रांवरील अतिक्रमण तीन महिन्यात हटविणार
औरंगाबाद वनविभागांतर्गत औरंगाबाद व जालना या दोन जिल्ह्यांमधील वनक्षेत्रावर झालेले अतिक्रमण येत्या तीन महिन्यात हटविण्यात येईल अशी ग्वाही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. जयंत पाटील यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता.
या दोन्ही जिल्ह्यांमध्ये एप्रिल २०१४ अखेर असलेल्या १०७ हेक्टर ३३ आर वनक्षेत्रातील अतिक्रमणापैकी ६१.१८ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले आहे. सतेच ११.५० हेक्टर अतिक्रमित क्षेत्राची दोन प्रकरणे न्यायप्रविष्ट आहेत. उर्वरित २६.६५ हेक्टर क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही सुरू असून येत्या तीन महिन्यात ही अतिक्रमणे पूर्णपणे हटविण्यात येतील अशी माहिती मुनगंटीवार यांनी दिली.
तिवरांच्या जंगलांवर बेकायदा भराव
मुंबईतील मालाड येथील मार्वे समुद्रकिनाऱ्याजवळील टॅबच्या पार्किंगशेजारी असलेल्या तिवरांच्या जंगलात बेकायदा भराव टाकून घरे बांधण्यात आल्याची माहिती राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात विजय गिरकर यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर लेखी उत्तरात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही माहिती दिली. या क्षेत्रावर भरावापूर्वी तिवराचे जंगल असल्याचे गुगल इमेजवरून लक्षात आले.
यासंदर्भात पश्चिम मुंबईच्या वनक्षेत्रपालांनी बोरीवलीच्या तहसीलदारांना अहवाल पाठवला असू यावर नियमांप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे असे लेखी उत्तरात नमूद करण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Promotion of Bamboo Business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.