पृथ्वीराज चव्हाण आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 15, 2014 11:03 IST2014-09-15T09:43:25+5:302014-09-15T11:03:47+5:30
सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

पृथ्वीराज चव्हाण आयसीयूमधील पेशंटप्रमाणे अस्थिर - उद्धव ठाकरे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १५ - सुरक्षित मतदारसंघ मिळत नसल्याने पृथ्वीराज चव्हाण यांचे मन अतिदक्षता विभागातील पेशंटप्रमाणे अस्थिर बनले असल्याची टीका शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. सामनाच्या अग्रलेखातून पृथ्वीराज चव्हाणांवर टीकास्त्र सोडण्यात आले असून 'अतिदक्षता विभागातील पेशंट अनेकदा अर्धग्लानीत जाऊन असंबद्ध बरळतो तसे काहीसे राज्याच्या मावळत्या मुख्यमंत्र्यांचे झाले आहे' असल्याचे लेखात म्हटले आहे.
शनिवारी एका मुलाखतीदरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी उद्धव ठाकरेंना सरकार चालवण्याचा अनुभव नाही, १९९५ मध्ये भाजप - सेनेचे सरकार आले तेव्हा उद्धव यांचा सरकारमध्ये सहभाग नव्हता, असा टोमणा मारला होता. त्यामुळे खवळलेल्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना खडे बोल सुनावले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांचे हे विधान म्हणजे 'लोका सांगे ब्रह्मज्ञान' अशा म्हणीप्रमाणे असून ते जेव्हा राज्यात मुख्यमंत्री बनून आले तेव्हा त्यांच्याकडे कोणत्या अनुभवाची डिग्री होती? असा सवाल विचारला आहे. मुख्यमंत्र्यांना तेव्हा सर्व तालुके माहीत नव्हते अथवा पश्चिम महाराष्ट्रातील स्वपक्षीय आमदारांची नावेही माहीत नव्हती. केंद्रातील राज्यमंत्रीपदाची कारकुनी हा जर अनुभव असेल तर मंत्रालयातील ‘डेस्क ऑफिसर’चा अनुभव जास्त म्हणावा लागेल, अशी टीका लेखात करण्यात आली आहे.
ज्यांनी अनुभवाचे ढोल वाडवले, त्या सर्वांनी देशाचे व राज्याचे दिवाळेच काढले. पृथ्वीराज चव्हाण यांनी महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याची गादी गरम केली, मात्र त्याचा फायदा ना गादीला झाला ना महाराष्ट्राला असे सांगत गादीत फक्त भ्रष्टाचाराचे ढेकूण झाल्याचे लेखाच म्हटले आहे. हे ढेकूण मारण्यासाठी येत्या निवडणुकीत जनता फवारणी करणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. अडीचेक वर्षांच्या अनुभवाचे सर्टिफिकेट आता कायमचे ‘फ्रेम’ करून घरीच लावून ठेवा असा खोचक सल्लाही त्यांनी दिला आहे.