पंतप्रधान जन-धन योजनेमुळे आर्थिक विषमता दूर होईल

By Admin | Updated: August 29, 2014 01:01 IST2014-08-29T01:01:29+5:302014-08-29T01:01:29+5:30

पंतप्रधान जन-धन योजना देशातील गरिबी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व यातून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.

Prime Minister Jan-Dhan Yojana will remove financial inequality | पंतप्रधान जन-धन योजनेमुळे आर्थिक विषमता दूर होईल

पंतप्रधान जन-धन योजनेमुळे आर्थिक विषमता दूर होईल

नितीन गडकरी : नागपूर जिल्ह्यात योजनेचा शुभारंभ
नागपूर : पंतप्रधान जन-धन योजना देशातील गरिबी दूर करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरेल व यातून समाजातील आर्थिक विषमता दूर होईल, असा विश्वास केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
बँक आॅफ इंडिया व महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने येथील साई सभागृहात आयोजित विशेष कार्यक्रमात नागपूर जिल्ह्यात या योजनेचा शुभारंभ गडकरी यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक संचालक ज्योतिका जीवनी, बँक आॅफ इंडियाचे कार्यकारी संचालक अरुण श्रीवास्तव, बँक आॅफ इंडियाचे सरव्यवस्थापक नंदकुमार पुजारी आणि आयडीबीआय बँकेचे उपव्यवस्थापकीय संचालक बी.के. बत्रा यांच्यासह महापौर व आमदार अनिल सोले, सुधाकर देशमुख, नागो गाणार आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष संध्या गोतमारे उपस्थित होते.
गडकरी म्हणाले की, समाजातील गोरगरीब जनतेसाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. गावात, झोपडपट्ट्यात राहणाऱ्या नागरिकांचे बँकेत खाते उघडून देण्यात येणार आहेत. सहा महिने सुरळीत व्यवहार केल्यावर खातेधारकाला पाच हजार रुपयांपर्यंत ‘ओव्हरड्राफ्ट’ मिळण्याची सुविधा यात आहे. तसेच एक लाखाचे विमा संरक्षण मिळणार आहे. यातून गोरगरिबांना आर्थिक मदत तर होईलच शिवाय केंद्र व राज्याच्या विविध योजनांचाही त्याला लाभ मिळेल. त्याला सावकाराकडे जाण्याची गरज भासणार नाही. गरिबी दूर करण्यासाठी केंद्र सरकारने उचललेले हे एक महत्त्वाकांक्षी पाऊल असून, यातून समाजाचे आर्थिक व सामाजित चित्र बदलेल. समाजातील आर्थिक विषमता दूर होईल.
बँका सद्यस्थितीत ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच कर्ज देते, गरीब जनता वंचित राहते. या योजनेतून त्यांना अर्थपुरवठा होणार आहे. घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्याची वृत्ती गरिबांची असते. त्यामुळे परतफेडीनंतर अधिक कर्जही त्यांना मिळू शकेल. योजनेची अंमलबजावणी करताना बँकेच्या अधिकाऱ्यांनीही मानवी दृष्टिकोन ठेवावा, असे आवाहनही गडकरी यांनी यावेळी केले. महिला बचत गटांनाही या योजनेचा लाभ मिळेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी नागपूर विभागातील विविध खातेदारांना उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते बँकेच्या पासबुकचे वितरण करण्यात आले. प्रास्ताविक अरुण श्रीवास्तव यांनी केले तर उपस्थितांचे आभार बँक आॅफ इंडियाचे महेंद्र वाही यांनी मानले.
देशपातळीवर या योजनेचा शुभारंभ दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाला. या कार्यक्रमातील मोदींच्या भाषणाचे प्रक्षेपण कार्यक्रमस्थळी करण्यात आले होते. कार्यक्रमाला पालकमंत्री नितीन राऊत व अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख अनुपस्थित होते.
कार्यक्रमाला माजी आमदार गिरीश गांधी, बँक आॅफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी रमण मूर्ती, नाबार्डचे पी.एल. कुळकर्णी यांच्यासह राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात १२००० खाती
पंतप्रधान जनधन योजनेत नागपूर जिल्ह्यात १२००० खाती उघडण्यात आल्याचे गडकरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. विभागातील सहा जिल्ह्यांचा विचार करता ही संख्या दोन लाखांपेक्षा अधिक असल्याचे बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. २६ जानेवारीपर्यंत खाते उघडण्याची मोहीम सुरूच राहणार असून या काळात जास्तीत जास्त खाती उघडण्यात येईल, असा विश्वास यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
गडकरींची नागपूरला प्राथमिकता
पंतप्रधान जनधन योजनेच्या मुंबई येथील कार्यक्रमास उपस्थित राहण्याची सूचना गडकरी यांना करण्यात आली होती. पण त्यांनी नागपूरच्या कार्यक्रमाला प्राथमिकता दिली. खुद्द गडकरी यांनीच ही माहिती त्यांच्या भाषणादरम्यान दिली.

Web Title: Prime Minister Jan-Dhan Yojana will remove financial inequality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.