‘घुमान’ची तयारी अंतिम टप्प्यात
By Admin | Updated: March 31, 2015 03:33 IST2015-03-31T03:33:54+5:302015-03-31T03:33:54+5:30
पंजाबमधील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली

‘घुमान’ची तयारी अंतिम टप्प्यात
पुणे : पंजाबमधील घुमान या संत नामदेवांच्या कर्मभूमीत होत असलेल्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी आता अंतिम टप्प्यात आली असून, महाराष्ट्रातील प्रतिनिधींचे स्वागत करण्यासाठी घुमानवासी सज्ज झाले आहेत. अमृतसर ते घुमान या मुख्य मार्गाचे काम पूर्ण करण्यात आले आहे.
हा एक ऐतिहासिक सोहळा आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे संत नामदेवांच्या भूमीतून सर्व मंडळी घुमानला येत आहे, ही पंजाबवासीयांसाठी आनंदाची बाब असल्याने हे आपल्या घरचेच कार्य आहे, या भावनेतून पंजाबी नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. पंजाब सरकारनेही ३ ते ५ एप्रिलदरम्यान होणाऱ्या संमेलनासाठी सर्वतोपरी सहकार्य केले असल्याचे संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत सांगितले.
मुख्य मंडप आणि परिसंवादाच्या सभागृहांचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. पंजाब सरकारने घुमानच्या परिसरात स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर बसविल्याने पाच दिवस अखंडित व पुरेसा वीजपुरवठा होऊ शकेल. संमेलनकाळात प्रतिनिधींच्या सोयीसाठी तब्बल १०० बसेसची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे देसडला यांनी सांगितले.
स्वच्छतेसाठी रेल्वेमध्ये ५ ते ६ स्वयंसेवकांची तुकडी तैनात करण्यात आली असून, ४० तासांचा प्रवास कंटाळवाणा वाटू नये यासाठी ट्रेनमध्ये शब्दकोडे, अंताक्षरी स्पर्धा आदींचे आयोजनही करण्यात आले आहे. तसेच रेल्वेने जाणाऱ्या सर्व २,८०० प्रवाशांचा अपघाती विमा उतरविण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.