प्राणहिता, गोदेचे पाणी पळविणार
By Admin | Updated: September 15, 2015 01:19 IST2015-09-15T01:19:14+5:302015-09-15T01:19:14+5:30
सिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित

प्राणहिता, गोदेचे पाणी पळविणार
- अभिनय खोपडे, गडचिरोली
सिरोंचा तालुक्याच्या सीमेजवळ प्राणहिता व गोदावरी नदीतीरावर नवा सिंचन प्रकल्प सुरू करण्याच्या उद्देशाने तेलंगण सरकारने विशेष हवाई सर्वेक्षण केले आहे. इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्याच्या तेलंगण सरकारच्या हालचालीमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहेत.
तेलंगणने चार ते पाच वर्षांपूर्वी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांच्या सीमांना लागून तेलंगण राज्यात तुमडीहेटी गावाजवळ विशालकाय चव्हेला सिंचन प्रकल्पाचे काम सुरू केले आहे.
या प्रकल्पासाठी चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांतील सहा ते सात तालुक्यांचे शेती सिंचनाचे पाणी पळविले जाणार आहे. आतापर्यंत ५०० कोटी रुपयांचा खर्च तेलंगणने या प्रकल्पावर केला आहे.
तत्कालीन काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात भाजपा नेत्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला होता. मात्र आता सत्तेवर आल्यानंतर हा विरोध थंड पडला आहे. हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प घोषित करावा म्हणून तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी केंद्रीयमंत्री उमा भारती यांची नुकतीच दिल्ली येथे भेट घेतली, अशीही माहिती पुढे आली आहे.
हे सर्व सुरू असतानाच महाराष्ट्राच्या सिरोंचा तालुक्याच्या सीमेलगत शुक्रवार व शनिवारी तेलंगण सरकारकडून हेलिकॉप्टरच्या साहाय्याने कालेश्वर भागातील गोदावरी तीरावर कोटापल्ली, महादेवपूर, कालेश्वर या भागात हवाई सर्वेक्षण करण्यात आले. शुक्रवारी ११ सप्टेंबरला चार ते पाच हवाई फेऱ्या करण्यात आल्या; तर शनिवारी १० ते १५ हवाई फेऱ्या तेलंगणा व महाराष्ट्र सीमेलगत गोदावरी नदी भागात झालेल्या आहेत.
या हेलिकॉप्टरमध्ये तेलंगणा सरकारच्या जलसंपदा विभागाचे वरिष्ठ अधिकारी होते व त्यांनी या भागात प्राणहिता व गोदावरी नदीच्या पाण्यावर नवीन सिंचन योजना निर्माण करण्याच्या दृष्टीने हे सर्वेक्षण केले, अशी माहिती मिळाली आहे. हेलिकॉप्टरच्या अधिक फेऱ्या सिरोंचा तालुक्याच्या लगत झाल्यामुळे काही नागरिकांनी आदिलाबादच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी हवाई सर्वेक्षण होत असल्याला दुजोरा दिला, अशी माहितीही मिळाली आहे.
बाबा आमटे यांनी केला होता विरोध
सिरोंचा तालुक्याला लागून १९८०-८५ मध्ये इचमपल्ली धरण निर्माण करण्याचा प्रयत्न तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने केला होता. त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला कठोर विरोध केला. त्यामुळे हा प्रकल्प थंडबस्त्यात टाकण्यात आला होता. आता पुन्हा इचमपल्ली प्रकल्प पुनर्जीवित करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहे.
अमरिशराव आत्राम यांचे मौन
काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात चव्हेला-प्राणहिता या महाकाय सिंचन योजनेला नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष व राज्याचे विद्यमान आदिवासी विकास राज्यमंत्री अमरिशराव आत्राम यांनी कठोर विरोध
होता. मात्र आता ते या प्रश्नावर मौन बाळगून आहेत.