मुंबई - आम्ही शिवसेना आणि रिपब्लिकन सेनेची संयुक्त पत्रकार परिषद पाहिली. रिपब्लिकन सेनेची भाजपच्या मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेसोबतची युती झाली. केवळ संविधान वाचवण्यासाठी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांविरूद्धच्या लढाईविरुद्ध ही युती नाही तर फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारसरणीच्या विरोधात आहे. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे आम्हाला फक्त निराशा झाली नाहीये, तर हे वेदनादायक आहे अशी तीव्र भावना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे.
प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं की, पत्रकार परिषदेत आनंदराज आंबेडकर यांनी भाजपा आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या विशेषतः शिवसेनेच्या तसेच संविधान, फुले-शाहू-आंबेडकर विचारसरणी आणि भारतीय प्रजासत्ताक विरुद्धच्या त्यांच्या अजेंड्यावर पांघरूण घालण्यात गुंतले होते. आनंदराज आंबेडकर यांनी महायुतीच्या "माझी लाडकी बहीण योजनां"चे कौतुक केले. कदाचित, ते विसरले असतील की महाराष्ट्र सरकारने यावर्षी एससी, एसटीसाठी राखीव ठेवलेले ७४६ कोटी रुपये "मुख्यमंत्री लाडकी बहीण" योजनेकडे वळवले आहेत. आनंदराज आंबेडकर यांनी निधी वळवण्याची केलेली पाठराखण ही एससी, एसटी निधी वळणाच्या विरोधात लढणाऱ्या आंबेडकरी जनतेशी विश्वासघात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर "संविधान कधीच खतरे में नव्हतं" हे त्यांचं वाक्य लाखो संविधानवाद्यांच्या पाठीत वार आहे. संविधान बदलण्यासाठी आणि "हिंदूराष्ट्र" स्थापन करण्याच्या आरएसएस-भाजप आणि त्यांच्या सहयोगींच्या दुष्ट अजेंड्याला पाठीशी घालणे आहे असं त्यांनी म्हटलं.
तसेच आनंदराज आंबेडकर यांनी सत्तेसाठी भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेशी युती केली आहे ? की, आरएसएस-भाजपच्या अजेंड्याला लपवण्यासाठी, त्यांचे हाताचे बाहुले बनून एससी, एसटी, ओबीसी, अल्पसंख्याक, विशेषतः बौद्ध आणि मुस्लिमांविरुद्धच्या आरएसएसच्या गुन्ह्यांना आणि अजेंड्यांना पाठीशी घालण्यासाठी केलीय? हाताचे बाहुले बनण्याच्या बदल्यात त्यांच्याकडून काही वैयक्तिक आर्थिक फायदा मिळालाय का? याचा आम्ही विचार करतोय असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दरम्यान, हे तेच महायुती सरकार आहे, ज्यांनी जनसुरक्षा विधेयक आणले आहे. शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारविरोधी आपला आवाज उचलणाऱ्या दलित, आदिवासी आणि मुस्लिमांना गप्प करण्यासाठी हे एक शस्त्र त्यांनी आणले आहे. हे तेच महायुती सरकार आहे, ज्यांनी महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आणि संघर्षांवर आधारित 'फुले' चित्रपटाच्या प्रदर्शनाला विरोध केला होता. ज्याने भीमसैनिक शहिद सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूला आजारपणामुळे मृत्यू म्हणून खोटे लेबल लावले. हे तेच आरएसएस-भाजप आहे, ज्याच्या विरोधात भारतात आणि परदेशात बौद्ध समूह महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढत आहेत. हा तोच आरएसएस-भाजप आहे, ज्याची मूळ विचारसरणी भारतीय संविधान, भारताच्या सामाजिक आणि धार्मिक रचनेविरुद्ध आणि अल्पसंख्याकांच्या, विशेषतः बौद्ध आणि मुस्लिमांच्या विरुद्ध आहे अशी आठवणही प्रकाश आंबेडकरांनी आनंदराज आंबेडकरांना करून दिली.
रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना वंचितमध्ये येण्याचं आवाहन
वंचित बहुजन आघाडीने आरएसएस-भाजप आणि महायुतीच्या या संविधानविरोधी दुष्ट हेतूंविरुद्ध लढा दिला आहे आणि लढा देत राहील. आम्ही यापूर्वीच्या निवडणुकीत आनंदराज आंबेडकरांच्या रिपब्लिकन सेनेला पाठिंबा दिला होता. आनंदराज आंबेडकरांच्या विनंतीवरून, आम्ही रिपब्लिकन सेनेला सामावून घेतले, त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या उमेदवारांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या एबी फॉर्मवर निवडणूक लढवली. आम्ही २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही हेच सौजन्य दाखवले आणि आनंदराज आंबेडकर यांनी आमच्या पाठिंब्याने अमरावती लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. हे सौजन्य आता संपत आहे असं प्रकाश आंबेडकरांनी जाहीर केले. त्याशिवाय वंचित बहुजन आघाडी वेगवेगळे मते-मतांतरे सामावून घेऊ शकते, परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधी आणि आरएसएस-भाजपच्या हातचे बाहुले झालेल्या लोकांच्या विचारांना जागा नाही. आता निर्णय फुले-शाहू-आंबेडकरवाद्यांवर आहे. त्यांना संविधानाच्या जागी मनुस्मृती आणण्याची विचारसरणी असलेल्या आरएसएस-भाजपच्या बाहुल्यासोबत उभे राहायचे आहे की, ज्याची विचारसरणी संविधानाच्या रक्षणासाठी आहे अशा व्यक्तीसोबत उभे राहायचे आहे. आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे आम्ही निराश आहोत. ही भावना केवळ आमच्यापुरती मर्यादित नाही याची आम्हाला खात्री आहे. त्यामुळे आनंदराज आंबेडकरांच्या निर्णयामुळे नाराज असलेल्या रिपब्लिकन सेनेच्या सदस्यांना, कार्यकर्त्यांना, पदाधिकारी यांना वंचित बहुजन आघाडीत सामील होण्याचे आवाहन प्रकाश आंबेडकरांनी केले.