लोकमत असणाऱ्यांनाच पदे
By Admin | Updated: October 27, 2014 23:29 IST2014-10-27T23:29:06+5:302014-10-27T23:29:06+5:30
नीतेश राणे : काँग्रेस जिल्हाअंतर्गत फेरबदलाचे संकेत

लोकमत असणाऱ्यांनाच पदे
कणकवली : विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्ष संघटनेचा जेवढा फायदा व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. प्रचारादरम्यान मतदारांशी संपर्क साधताना काँग्रेस पक्ष कमकुवत झाल्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे यापुढे ज्या कार्यकर्त्यांबरोबर लोकमत असेल त्यांनाच पक्ष संघटनेत महत्वाची पदे दिली जातील, असे काँग्रेस प्रांतिक सदस्य आमदार नीतेश राणे यांनी स्पष्ट केले. काँग्रेस संपर्क कार्यालयात सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, शरद कर्ले, समीर नलावडे, कन्हैय्या पारकर उपस्थित होते. नीतेश राणे म्हणाले, पक्षाची नुसती पदे घेऊन फक्त ओळखपत्रे छापण्यासाठी तसेच ठेकेदार होण्यासाठी उपयोग करणारे कार्यकर्ते आता आम्हांला नको आहेत. ज्यांचे गावात नाव घेतल्यावर मते कमी पडतात त्यांना पक्ष संघटनेत यापुढे स्थान दिले जाणार नाही. नि:स्वार्थीपणे काम करेल त्याच कार्यकर्त्याला सर्वार्थाने ताकद देऊन पक्ष संघटनेत कार्यरत करण्यात येईल. स्वत:चे खिसे भरण्यापेक्षा जनतेसाठी काम करणारे नि:स्वार्थी कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. पक्षाचे पदाधिकारी असलेले व ठेकेदारी करणाऱ्यांचा पक्षाला कोणत्याही प्रकारचा फायदा होत नाही. त्यामुळे अशा पदाधिकाऱ्यांच्या नावाची सूची तयार करण्यात आली आहे. त्यांच्यावर निश्चितच कारवाई करण्यात येईल. मी एक संघटनेतून तयार झालेला कार्यकर्ता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष प्रामाणिक व निष्ठावान कार्यकर्त्यांच्या माध्यमातून उभा करण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना पदे सोडावी लागतील त्यांचे लवकरच राजीनामे घेतले जातील. काँग्रेस नेते नारायण राणे यांना अपेक्षित असल्याप्रमाणे सिंधुदुर्गातील काँग्रेस पक्षाची पुर्नबांधणी प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या माध्यमातून केली जाईल.
आमदार आपल्या दारी
मतदारांनी मतपेटीतून जो विश्वास माझ्यावर दाखविला आहे तो सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्न राहणार आहे. माझा विजय फक्त जनतेमुळेच झाला असून मतदारांनी आमदारांकडे येण्यापेक्षा आमदारच आपल्या दारी असा उपक्रम राबविणार आहे. आठवड्यातील तीन दिवस मतदारसंघात उपस्थित राहणार असून ५ नोव्हेंबरनंतर मतदारांची भेट घेण्यासाठी दौरा करणार असल्याचे आमदार राणे म्हणाले. (वार्ताहर)
नुकसानभरपाईसाठी प्रयत्न करणार
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची मोठी हानी झाली आहे.
अवकाळी पावसाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. नवीन शासन सत्तेवर येताच मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना भात पिकाबाबत नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी करणार आहे.
‘त्या’ चुका करणार नाही
माजी आमदार प्रमोद जठार यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात म्हणावा तसा जनसंपर्क ठेवला नाही. त्यांनी केलेल्या चुका आपण करणार नसल्याचेही राणे यांनी यावेळी स्पष्ट केले. निवडणुकीचे वारे आता संपले असून विरोधकांवर फक्त टीका न करता पक्ष बांधणीसाठी आपले प्रयत्न राहणार आहेत.
देवगड व कणकवली येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांबरोबरच इतर रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत अशीही मागणी करणार असल्याचे आमदार राणे म्हणाले.
परफॉर्मन्स दाखवा, पदे घ्या
पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या सर्वांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पक्षाचा वापर करून स्वत:ची तुंबडी भरणाऱ्यांचे दिवस आता संपले आहेत.
पक्षातील मोजकेच लोक आर्थिकदृष्ट्या संपन्न होत असून सामान्य कार्यकर्ते मात्र गरीबीत खितपत पडले आहेत.
त्यामुळे यापुढे परफॉर्मन्स दाखवा आणि पदे घ्या असे धोरण पक्ष संघटनेत राहणार असल्याचे नीतेश राणे यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष राजीनामा देणार
विधानसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत हे नारायण राणे यांच्याकडे राजीनामा सादर करणार आहेत. जिल्ह्यातील चार तालुकाध्यक्षांसह कुडाळ तालुक्यातील काँग्रेस विभागीय अध्यक्षांनीही आपल्या पदाचे राजीनामे दिले असल्याचे यावेळी राणे यांनी सांगितले.
ताकद द्या;संघटना वाढवितो
ठाण्यापासून सिंधुदुर्गापर्यंतच्या कोकण विभागात काँग्रेसचा मी एकमेव आमदार आहे. त्यामुळे या विभागात काँग्रेस पक्ष वाढविण्याची जबाबदारी माझ्यावर पडली आहे. मात्र पक्षाकडूनही तितकीच ताकद मिळणे आवश्यक आहे. पक्षविरोधी काम करणाऱ्यांवर पक्षाने कारवाई करावी. तसे झाले तर कोकणात पुन्हा एकदा काँग्रेस पक्ष संघटना वाढविण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात येतील, असेही राणे म्हणाले. विरोधी पक्षाचा आमदार आहे असे सांगत रडत बसण्यापेक्षा येत्या पाच वर्षात जनतेला दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्याचे ध्येय राहणार आहे.