खोपोलीत पाताळगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी
By Admin | Updated: June 29, 2016 02:34 IST2016-06-29T02:34:58+5:302016-06-29T02:34:58+5:30
कुक्कुटपालन व्यावसायिकाने मृत पक्ष्यांचे पूर्ण शरीर व कटिंग केलेल्या पक्ष्यांचे पाय, डोके, पंख, पिसे असे अवयव पोत्यात भरून टाकल्याने ते सडले

खोपोलीत पाताळगंगा नदीच्या पाण्याला दुर्गंधी
वावोशी : हाळ गावाच्या हद्दीत खोपोली म्हाडा कॉलनीजवळील पाताळगंगा नदीपात्रात कुक्कुटपालन व्यावसायिकाने मृत पक्ष्यांचे पूर्ण शरीर व कटिंग केलेल्या पक्ष्यांचे पाय, डोके, पंख, पिसे असे अवयव पोत्यात भरून टाकल्याने ते सडले आहेत. यामुळे या परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून येथील रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. असे अवयव नेहमीच या ठिकाणी टाकण्यात येत असल्याचा आरोप महड गावातील ग्रामस्थ करीत आहेत.
गावामध्ये साथीची रोगराई पसरू नये म्हणून खालापूर नगरपंचायतीने याबाबत लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे. तर शिवसेना ग्राहक कक्ष तालुका संघटक किरण हडप यांनी लेखी पत्राद्वारे आरोग्य अधिकारी खालापूर यांना चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे. महड गावाच्या पूर्व बाजूस हाळ गावाच्या हद्दीत व खोपोली नगरपालिकेच्या आदोशी स्मशानभूमीलगत मृत पक्ष्यांचे अवयव ट्रकभर सुमारे २०० पोती नदीपात्रात व परिसरच्या आडोशाला टाकल्याने दुर्गंधी पसरून रोगराई होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आदोशी, हाळ, महड व खोपोली नगरपालिका हद्दीतील ताकई, शिळगाव तसेच रमाधाम वृद्धाश्रम परिसरात येत असल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी चार वर्षांपूर्वी अशाच मृत पक्ष्यांच्या अवयवाच्या गोणीमधील मांस खावून दोन हजारच्या आसपास कावळे मृत झाल्याची घटना घडली होती.
खालापूर नगरपंचायतीने याबाबत चौकशी करून या गोणीमध्ये मृत कोंबड्यांचे अवयव सडक्या अवस्थेत असल्याचा निष्कर्ष काढत ही जागा खोपोली नगरपालिका हद्दीत असल्याचे सांगितले. तर हाळ ग्रामस्थांनी डोलवली गावाजवळ असणाऱ्या मोठ्या उद्योजकाच्या मालकीच्या पोल्ट्रीतील कोंबड्या असाव्यात अशी शंका व्यक्त केली.