राजकीय उदासीनता : संस्थात्मक पडझडीच्या काळात स्मारकाच्या उभारणीला १४ वर्षांचा अडथळा
By Admin | Updated: November 13, 2014 00:02 IST2014-11-12T23:42:18+5:302014-11-13T00:02:02+5:30
--वसंतदादा जयंती विशेष---संस्थात्मक उभारणी आणि प्रगतीच्या पंखांना बळ देणाऱ्या तुमच्यासारख्या नेतृत्वाला अवघा जिल्हा सलाम करतो. तरीही

राजकीय उदासीनता : संस्थात्मक पडझडीच्या काळात स्मारकाच्या उभारणीला १४ वर्षांचा अडथळा
अविनाश कोळी - सांगली --‘आदरणीय वसंतदादा..! हा जिल्हा तुमच्या नावाने ओळखला जातो. संस्थात्मक उभारणी आणि प्रगतीच्या पंखांना बळ देणाऱ्या तुमच्यासारख्या नेतृत्वाला अवघा जिल्हा सलाम करतो. तरीही तुम्ही उभारलेल्या संस्थांची सध्याची पडझड तुमच्या आत्म्याला प्रचंड वेदनादायी ठरत असणार, यात शंका नाही. तुमच्यावर प्रेम करणारे असंख्य सांगलीकरही अशाच वेदनांनी त्रस्त आहेत. जिथे संस्थाच मोडकळीस येत आहेत, तिथे नव्याने उभारणाऱ्या स्मारकाची काय वेगळी अवस्था असणार आहे? तब्बल १४ वर्षांचा वनवास या स्मारकाच्या उभारणीला झाला. तरीही अजून तुमच्या स्मृतींना वास्तुरुपात जतन करण्याच्या मनोदयाला मूर्तस्वरुप प्राप्त होऊ शकले नाही, हे या सांगली जिल्ह्याचे दुर्दैव.’
‘तुमचे नाव तसे जिल्ह्याच्या आणि राज्याच्या कक्षा रुंदावत देशपातळीपर्यंत पोहोचले. म्हणूनच दादाप्रेमींची संख्याही राज्यात आणि देशाच्या अनेक भागात मोठी आहे. राज्यातील अनेक नेत्यांनीही तुमच्या कार्याची उदाहरणे भाषणांमधून दिली. सहकारमहर्षी म्हणून तुमचा गौरवही केला जातो. अशा या जिल्ह्यात आणि राज्यात तुमच्या स्मारकाच्या व्यथेची कहाणी १४ वर्षांपासून सुरू आहे. जिथे एकेका मतदारसंघातील निवडणुकांमधून ५0 ते १00 कोटींचा चुराडा सहजासहजी केला जातो, तिथे तुमच्या स्मारकाला अवघे ९ कोटीही मिळू शकत नाहीत! त्यासाठी १४ वर्षांची प्रदीर्घ प्रतीक्षा करावी लागते. परिस्थितीचा आढावा घेतला, तर औपचारिकता म्हणून स्मारकाची इमारत उभारण्यात येत आहे की काय?, अशी शंका आता दादाप्रेमींना येत आहे.
मंत्र्यांची खाण म्हणून या जिल्ह्याची राज्यात ओळख. तीन-चार मंत्रीपदे याठिकाणी ठरलेली असतात. खातीही साधीसुधी नसतात. मोठमोठ्या खात्यांची मंत्रीपदे जिल्ह्याला मिळूनही तुमच्या स्मारकासाठी शासनाकडे वारंवार हात पसरावे लागतात. एका तपाहूनही अधिक काळ या स्मारकाच्या निधीसाठी शासनाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. कधी ५0 लाख, कधी १ कोटी, तर कधी २ कोटी रुपये पदरात पडतात. तेवढ्याच पैशात होईल तेवढे काम करून पुन्हा शासनाकडे तोंड करून याचना करायची, अशी केविलवाणी अवस्था या सांगली जिल्ह्याची झाली आहे. तुमची संस्थात्मक उभारणीतील तत्परता आणि आताची राजकीय उदासीनता यांचा विचार केला, तर आणखी काही वर्षे तुमच्या स्मारकाला प्रतीक्षा करावी लागली, तर आश्चर्य वाटणार नाही. वर्षातून जयंती आणि पुण्यतिथीला तुमच्या पुतळ्याची स्वच्छता आणि पूजन तेवढे केले जाईल. तेवढ्यात दादा समाधान मानून घ्या! कारण तुमच्या वेदनांची कदर आता इथे कोणालाही राहिली नाही. दादा, तुम्हीही आता तुमच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य दादाप्रेमींसारखे वास्तव स्वीकारायलाच हवे. पर्याय कोणताही नाही.’
म्हणे निधी आला....
वसंतदादा स्मारकासाठी म्हणे आता अडिच कोटी रुपयांचा निधी आला आहे. या निधीतून पुढील कामे करता येतीलही. परंतु उर्वरित आणखी साडेतीन कोटीच्या निधीसाठी पुन्हा राज्य शासनाचे उंबरठे झिजवावेच लागणार आहेत. त्यामुळे वसंतदादा स्मारकाचे दुखणे, अडथळे अजूनही संपलेले नाहीत. निधीच्या अडथळ्यांची शर्यत आता १४ वर्षांवरून १५ किंवा १६ वर्षांवर गेली, तर त्याचे कोणालाही आश्चर्य वाटणार नाही.