अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द

By Admin | Updated: June 4, 2014 00:36 IST2014-06-03T23:44:12+5:302014-06-04T00:36:18+5:30

गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली़

Political career of many of the dead ended | अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द

अकाली निधनाने संपली अनेकांची राजकीय कारकीर्द

फराज अहमद/नवी दिल्ली : गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली अपघाती निधनाने महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली़ मुंडेंप्रमाणेच असेच अनेक नेते ऐन उमेदीत गेले़ अपघाती वा अनैसर्गिक मृत्युने अशाच अनेक दिग्गजांची राजकीय कारकीर्द संपली़ मुंडेंचे मेहुणे प्रमोद महाजन यांचाही राजकीय शिखरावर तळपत असताना असाच अकाली मृत्यू झाला़ प्रवीण महाजन या लहान भावानेच प्रमोद महाजन यांची गोळ्या घालून हत्या केली़ प्रमोद महाजन हे त्यावेळी अटलबिहारी वाजपेयीनंतरचे भाजपातील एक वरिष्ठ नेते होते़ भाजपात अत्युच्च स्थानी पोहोचण्याएवढी प्रतिभा त्यांच्यात होती़
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे १४ ऑगस्ट २०१२ रोजी निधन झाले. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे निधन हाही भारताच्या राजकारणात सर्वाधिक मोठी पोकळी निर्माण करणारा धक्का होता़ उण्यापुर्‍या ४६ व्या वर्षी तामिळनाडूतील श्रीपेरम्बुदूर येथील निवडणूक रॅलीदरम्यान श्रीलंकन तामीळ अतिरेक्यांच्या मानवी बॉम्बहल्ल्यात राजीव गांधी मृत्युमुखी पडले होते़ काँग्रेस पक्षातील एकेकाळचे पंतप्रधानपदाचे दावेदार मानले जाणारे राजेश पायलट यांचा ११ जून २००० रोजी एका सडक दुर्घटनेत मृत्यू झाला़ दौसा या आपल्या संसदीय मतदारसंघातून दिल्लीला येत असताना राजस्थान परिवहन मंडळाच्या बसने त्यांच्या वाहनाला धडक दिली होती़ पी़व्ही नरसिंहराव यांचे नेतृत्व काँग्रेसने निर्विवादपणे मान्य केले असताना पायलट त्यांच्याविरोधात उभे ठाकले होते़
काँग्रेस पक्षातीलच पंतप्रधानपदाचे संभाव्य उमेदवार आणि पक्षश्रेष्ठींचे निकटस्थ मानले जाणारे माधवराव शिंदे हेही असेच अपघातात गेले़ ३० सप्टेंबर २००१ रोजी मैनपुरीच्या आकाशात विमान दुर्घटनेत ते मृत्युमुखी पडले़
काँग्रेसचे माजी खासदार श्रीकांत जिचकार यांचे २ जून २००४ रोजी कार अपघातात निधन झाले. नागपूरजवळील कोंढाळी येथे त्यांच्या कारला एसटी बसने धडक दिली होती. अवघ्या ४७ व्या वर्षी जिचकार यांचे झालेले निधन चटका लावून गेले.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वाय. एस़ राजशेखर रेड्डी यांनीही हेलिकॉप्टर दुर्घटनेत आपले प्राण गमावले़
२००४ च्या आंध्र प्रदेश विधानसभा निवडणुकीत वाय़एस़ राजशेखर रेड्डी यांनी सत्ताधारी तेलगू देसम पार्टीला धूळ चारून काँग्रेसला पुन्हा सत्ता मिळवून दिली होती़ सप्टेंबर २००९ मध्ये हैदराबादनजीक नल्लामाला जंगलात त्यांचे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाले होते़ त्यांच्या मृत्यूसोबतच आंध्रातील काँग्रेस पक्षालाही हळूहळू घरघर लागली़
राजकीय नेत्यांच्या अकाली निधनाने केवळ काँग्रेस व भाजपाचेच नुकसान झालेले नाही तर तेलगू देसम पार्टीनेही आपले दोन महत्त्वाचे नेते असेच गमावले़
तत्कालीन लोकसभाध्यक्ष जी़एम़सी. बालयोगी यांचा मार्च २००२ मध्ये हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला़ यानंतर २०१२ मध्ये या पक्षाने के़येरन नायडू यांच्या रूपात आणखी एक प्रमुख नेता गमावला़ दशकभर दिल्लीतील तेलगू देसम पार्टीचा प्रमुख चेहरा राहिलेले के़येरन नायडू यांचा नोव्हेंबर २०१२ रोजी एका सडक दुर्घटनेत मृत्यू झाला़ विशाखाप˜णम येथून हैदराबादला जात असताना एका तेलाच्या टँकरने त्यांच्या कारला धडक दिली आणि ते जागीच गतप्राण झाले़ येरन नायडू आज हयात असते तर कदाचित मोदींच्या मंत्रिमंडळातील ते एक प्रमुख मंत्री असते़

Web Title: Political career of many of the dead ended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.