खड्ड्यांच्या धक्क्यांना काव्याचे कोंदण

By Admin | Updated: July 31, 2016 02:24 IST2016-07-31T02:24:49+5:302016-07-31T02:24:49+5:30

रायगड जिल्ह्यातील कोणताही; राज्य, जिल्हा, तालुका वा गावाला जोडणारा रस्ता असो, खड्ड्यांमुळे त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे.

Poetry for potholes | खड्ड्यांच्या धक्क्यांना काव्याचे कोंदण

खड्ड्यांच्या धक्क्यांना काव्याचे कोंदण

जयंत धुळप,
अलिबाग- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग असो वा रायगड जिल्ह्यातील कोणताही; राज्य, जिल्हा, तालुका वा गावाला जोडणारा रस्ता असो, खड्ड्यांमुळे त्यांची पूर्णपणे वाताहत झाली आहे. यामुळे वाहतूककोंडी, अपघात होत असून प्रवाशांमधील आजारही बळावत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात महामार्गाला खड्ड्यांचे नव्हे तर तळ्यांचे स्वरूप येते.
गेल्या २० वर्षांत सरकार दरबारी रस्त्यांबाबत नियोजन करण्यात आले असले तरी वास्तव निराळेच आहे. रस्त्याची दुरवस्था, खड्डे व त्यामुळे उद्भवणारे गंभीर प्रश्न आणि समस्या हा विषय आता केवळ प्रसिद्धीमाध्यमांचाच राहिलेला नाही, तर ‘रस्त्यावरील खड्डा’ हा कवी आणि साहित्यिकांच्या लेखनाचा विषय बनला आहे.
ह्लहँील्ल उ४’३४१ी ऊीू’्रल्ली२ अ१३ ऋ’ङ्म४१्र२ँी२ह्व अर्थात जेव्हा संस्कृतीचा ऱ्हास होतो, मानवी समस्यांचे प्रमाण वाढते, सामाजिक समस्या वृद्धिंगत होतात आणि त्या दूर करण्याकरिता जबाबदार असणारे समाज घटक अपुरे पडतात वा अपयशी ठरतात त्यावेळी समाजातील कलाकार, कवी, साहित्यिक, छायाचित्रकार हे कलासक्त समाज घटक प्रभावित होऊन या समस्या सोडवण्याकरिता पुढाकार घेतात, असा सिद्धांत आहे. जिल्ह्यातील कवींनी खड्ड्यांची संवेदनशीलतेने दखल घेऊन, समस्या दूर करण्यासाठी लेखणी हातात घेतली आणि कवींनी खड्ड्यांची समस्या आपल्या कवितांमध्ये शब्दबद्ध केली आहे.
>पोयनाड (अलिबाग) येथील लोकमत सखी सन्मान पुरस्कारप्राप्त कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे दररोज आपल्या शाळेत जाण्या-येण्याकरिता प्रवास करतात. गेल्या २० वर्षांतील पावसाळ््यातील रस्त्याची दुरवस्था अनुभवलेली असल्याने त्यांनी आपल्या या कवितेत या समस्येचा सखोल वेध घेतला आहे.
कोसळता पाऊस सारखा, रस्त्यावरती पाणी चढे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे
पावसाआधी रस्ते केले, कसेबसे ते काम उरकले
चार दिवसही जे ना टिकले, रस्त्याला त्या जाती तडे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥१॥
सामान्यांचे हालच होती, वेळेवरती पोहोचू न शकती
उशिरा जाता कामावरती, अधिकाऱ्याचा धाक अन् लेटमार्क पडे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥२॥
वाट काढीता खड्ड्यामधुनी, येऊनी धडके कधी कुणीतरी
शिव्या, शाप अन् मारामारी, रागाचा पाराही चढे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे ॥३॥
राजकारणी लक्ष न देती, गाडी विदेशी ते वापरती
गचके त्यांना मुळी न लागती, खड्ड्यांवर दृष्टी न पडे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥४॥
दरवर्षी कंत्राट मिळविती, यथातथा रस्तेही बनविती
कामाचा दर्जा न राखिती, तरीही कमाई खिशात पडे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥५॥
जन सारे वैतागून जाती, रस्त्यावरी आंदोलन करिती
जनकल्याणा खड्डे बुजवून, जखमेवरती मलम थोडे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥६॥
विकसनशील देशाची जनता, जीवनी खाचखळग्यांचा रस्ता
प्रगती करण्या खाईल खस्ता, म्हणून पावले पडती पुढे
खड्डेच खड्डे चहूकडे गं बाई, गाडी जाईल कशी पुढे॥७॥
>जिल्ह्यात पर्यटनाचा विकास होत आहे. परंतु खड्ड्यांमुळे पर्यटक जिल्हयात पोहोचणार कसा, याचा वेध श्रुती देसाई-राजे यांनी घेतला.
हाय काय, न्हाय काय
गोगलगाईचे पोटात पाय
खड्ड्यांमधून फिरता फिरता
रस्ते कोणाला दिसतात काय?
प्रवासी येतात कुठून कुठून
ड्रायव्हरचा ताबा जातो सुटून
वळणावळणावर अपघात होतात
गाड्यांचे टायर्स जातात फुटून
सावधपणे हाकावी गाडी
एवढंही त्यांना समजत नाय?
रस्त्यांची दुरु स्ती दरसाल
सर्वच त्यातून कमावणार माल
खड्ड्यांमुळे होतील तर होवोत
सामान्यांचे हालच हाल
चार पैसे कुणाला सुटले तर
तुम्हाला मिरच्या झोंबतात काय?
रायगड जिल्हा मोक्याचा
रस्ता मात्र त्याचा धोक्याचा
पर्यटनाच्या लोण्यावर
डोळा साऱ्या बोक्यांचा!
आमदार, खासदार, मंत्रीसंत्री
येतात जातात करतात काय?
हाय काय, न्हाय काय
गोगलगाईचे पोटात पाय...
>मुंबईतून महाडपर्यंत पोहोचणे म्हणजे प्रवाशांच्या पोटात गोळाच येतो. गोवा महामार्ग हरवलाच आहे का, असा प्रश्न सर्वांना पडतोय. याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न महाड येथील कवयित्री स्नेहा गांधी यांनी केला आहे.
हरवलाय माझा रस्ता
मला माझ्या उद्दिष्टापर्यंत पोहोचविणारा
प्रवासात मैलोन्मैल सहज सुंदर सोबत करणारा
विकासाची धोरणे राबविणारा
त्या त्या गावच्या प्रगतीचे प्रतिबिंब दाखविणारा
हरवलाय माझा रस्ता राजकारण, समाजकारण
भ्रष्टाचार अन् उदरभरण करणाऱ्यांच्या भेंडोळ्यात
मी सर्वसामान्य माणूस मात्र उभा आहे
अपघात आजार अन् दुरवस्था झेलत मृत्यूच्या दारात
हरवलाय माझा रस्ता, माझा आवाज
माझे अस्तित्वच खड्ड्यांच्या साम्राज्यात
सापडेल का तो, होईल सुखाचा प्रवास
की संपेल खड्ड्यातच माझ्या आयुष्याचा प्रवास?
>जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था सुधारण्याकरिता शासनाकडून धोरणात्मक निर्णयाची अपेक्षा जाता जाता कवयित्री स्मिता सहस्रबुद्धे यांनी केली आहे.
वाटेचीच लागलीय वाट
आणि वाटच खाचखळग्यांची झाली
येतीजाती वाहने होडीसारखी डुलू लागली
कधी तोल जाईल आणि कधी कायमचाच संपेल प्रवास
वाट लागलेल्या वाटेवर हीच भीती आसपास
खड्ड्यातला प्रवास हा खड्ड्यातच जाणार आपण
कुचकामी मलमपट्टी करून चरायला मिळते कुरण
कुठेतरी कुणीतरी बदलावे की धोरण
तेव्हाच टळेल अपमृत्यू नि अपघाती मरण
>मुंबईस जाताना काय समस्या येते ते ‘येऊकशी कशी मी नांदायला....’ या गाण्याच्या चालीवर अलिबागच्या कवयित्री अनिता जोशी यांनी शब्दबद्ध केले.
जाऊ कशी कशी मी मुंबईला हो, जाऊ कशी मी मुंबईला
रस्तोरस्ती खड्डे दिसती, रस्तोरस्ती खड्डे दिसती
अहो गाडी त्यामंदी वाकुडी होती
जीव लागलाय टांगणीला हो
जाऊ कशी कशी मी मुंबईला
गाडीची गं झालीया होडी
गाडीची ग झालीया होडी
होडी हाकण्यास वैतागे नावाडी,
मणके लागले झिजायला हो
जाऊ कशी कशी मी मुंबईला....
>सुधागड एज्युकेशन सोसायटी माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील यांनी खड्ड्यांची समस्या ‘वाहवा वाहवा चेंडू हा’ या जुन्या बालगीताच्या चालीवर, हलक्या फुलक्या शब्दांत शब्दबद्ध केली आहे.
वाहवा, वाहवा रस्ता हा, सुंदर कितीतरी खचित हा
छोटी मोठी तळी त्यामधी, कितीतरी विराजती पहा
अंगावरती तुषार सुंदर, उडती किती ते अहा अहा!
कुणी खेळती खो-खो येथे, कुणी आट्यापाट्या खेळती
खेळामधली मौज इथे, लहान मोठे सारे चाखिती!
सुंदर असला रस्ता पाहून, ट्रक एखादा घेतो डुलकी
प्रेमाने रिक्षा एखादी, देते त्या ‘जादूकी झप्पी!’
आयुष्याचा मार्ग खडतर, आहे किती ते पहा
उगाच नावे कशास ठेवा, शिकवण देतो रस्ता हा!
वाहवा, वाहवा रस्ता हा सुंदर कितीतरी खचित हो!!सारेच जण दुरवस्थेतील रस्ते आणि त्यावरील खड्ड्यांना दोष देत असताना, त्या दुरवस्थेतील रस्त्याच्या आत्मवृत्तातून पनवेल येथील कवयित्री ज्योत्स्ना राजपूत यांनी व्यथा शब्दबद्ध केली आहे.
माझ्यामुळे सगळेच त्रस्त
अनेकांची आयुष्यं केली म्हणे मी उद्ध्वस्त
कुणाचा पाय, कुणाचा हात
माझ्यामुळेच रोज एक नवा अपघात, माझ्यामुळे....?
सगळेच देतात मला दोष
सगळ्यांचा माझ्यावरच रोष....?
खरंतर मीच तक्र ार करतोय आज
दरवर्षीप्रमाणे मलाही
होतोच की बदलत्या हवामानाचा त्रास
त्यासाठी उपाय करायला हवा ना खास
पण ते बदलण्यापूर्वीच
फोटोग्राफर घेऊनच येतात
तथाकथित समाजसेवक
मग फोटो, मग लांबी रु ंदी
सगळं सगळं मोजून घेतात
मग निदान न करताच, माझ्यावर उपचार सुरू होतात
उकरल्या जातात माझ्या अंगावरच्या जखमा दरवर्षी नव्याने
केला जातो त्याच्यावर प्राथमिक उपचार
मलमपट्टी वैगरे वैगरे...
दोन दिवसांनी ती जखम बरी होतच नाही
तर नव्या ठिकाणी सुरु वात होते आणि मग जर्जर होतं अंग
सुरू होते माझीच माझ्या आयुष्याशी जंग
आता मीच वाट पाहतोय
कोणी सच्चा डॉक्टर येईल आणि
करेल माझ्या रोगाचं निदान
देईल मला हवं असलेलं माझं जुन रूप
मी वाट पाहतोय त्याची खूप
मग म्हणाल ना तुम्ही पण
हसते हसते कट जाए रस्ते.....

Web Title: Poetry for potholes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.