डहाणूमध्ये वृक्षारोपणाची सज्जता
By Admin | Updated: July 1, 2016 03:57 IST2016-07-01T03:57:49+5:302016-07-01T03:57:49+5:30
‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीनुसार संतांनी मानवाचे वृक्षांशी नाते जोडले आहे .

डहाणूमध्ये वृक्षारोपणाची सज्जता
डहाणू/बोडी: ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’ या उक्तीनुसार संतांनी मानवाचे वृक्षांशी नाते जोडले आहे . त्याच अनुषंगाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने १ जुलै रोजी वन महोत्सवाचे आयोजन करून शासनाने दोन कोटी झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. दरम्यान हरित महाराष्ट्रचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्यासाठी डहाणूतील प्रशासन सज्ज झाले असून सर्वच स्तरातून त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. हा महत्वाकांक्षी वृक्षारोपण कार्यक्रम शुक्रवारी राबविण्यात येणार आहे.
वन विभागाने वन महोत्सव आणि कृषिदिनाचे औचित्य साधून एकाच दिवशी दोन कोटी झाडे राज्यभरात लावण्याचा निर्णय घेतला आहे. या महत्वाकांक्षी उपक्रमात जवळपास वीस विभागांचा समावेश करण्यात आला असून कोणत्या विभागाने किती झाडे लावावीत याचे सर्वसाधारण लक्ष्य ठरवून देण्यात आले आहे. त्यानुसार डहाणूतील प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे.
डहाणू उप वन संरक्षक लडकत यांच्या अखत्यारीत डहाणू विभागात ३,३५,५५७० वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत. तर, डहाणू महसूल विभाग तहसिलदार प्रीतीलता कौरथी माने पाच मंडळात १,००० रोपे लावून घेणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग ४०० रोपांची लागवड करणार असल्याचे उप अभियंता पी. खैरनार यांनी सांगितले. गट विकास अधिकारी रमेश अवचार यांच्या देखरेखीखाली डहाणू पंचायत समितीच्या विविध विभागातून ५१,००० रोपे लावण्यात येणार आहेत. त्यानुसार तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या ४७० आणि २६ शाळांमध्ये प्रत्येकी २० रोपे तर नऊ प्राथमिक आरोग्य केंद्र व ६५ उप केंद्रात साधारणत: २० रोपे लावणार आहेत, असे पोलीस अधिकारी पांडकर यांनी सांगितले.
(वार्ताहर)
सर्वसामान्य जनता, स्वयंसेवी
संस्था तसेच महाविद्यालये आणि लोकप्रतिनिधी यांच्यातर्फे खाजगी, पडीक, सामूहिक, वनेतर तसेच रस्त्याच्या दुतर्फा सकाळी ६ ते सायंकाळी ६ या काळात वृक्षारोपण करण्यात येणार आहे. केवळ ही रोपे लावायची नसून, ती जगवायची जबाबदारी संबंधित विभाग प्रमुखावर असणार
आहे.