कामगिरीनुसारच जागावाटप व्हावे
By Admin | Updated: July 21, 2014 02:44 IST2014-07-21T02:44:51+5:302014-07-21T02:44:51+5:30
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील पक्षांच्या कामगिरीनुसार विधानसभा निवडणुकीचे जागावाटप व्हावे

कामगिरीनुसारच जागावाटप व्हावे
नाशिक : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील पक्षांच्या कामगिरीनुसार विधानसभा निवडणुकीचे जागावाटप व्हावे, अशी आमची अपेक्षा असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी येथील पक्षाच्या निर्धार मेळाव्यात केले.
तटकरे म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने कमी उमेदवार उभे केल्यानंतरही अधिक खासदार निवडून आले़ त्या तुलनेत काँग्रेसला यश मिळू शकले नाही़ गुजरातच्या विकासाबाबत बरीच चर्चा होत असली तरी नाशिकच्या विकासाचे रोल मॉडेलही चांगले असून त्याचा प्रचार होणे गरजेचे आहे़
राज्यात गेल्या २५ वर्षांतील भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली आहे़ कृषी संजीवनी, पाणीपुरवठा अशा योजनांद्वारे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकार हे शेतकरी तसेच राज्यातील गोरगरीब जनतेच्या पाठीशी उभे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले़
भाजपाच्या पाठीशी असलेल्या उद्योगपतींना ‘अच्छे दिन’ आले, तर शेतकऱ्यांचे ‘बुरे दिन’ सुरू झाले आहेत़ कांदा निर्यातबंदी, युरियाची भाववाढ, मुंबई-पुणे रेल्वेचे काम बंद झाले, तर कुंभमेळ्याचा साधा उल्लेखही अर्थसंकल्पात नाही़, असे सार्वजनिक बांधकाममंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)