माणसाला सुसंगतीची गरज
By Admin | Updated: September 18, 2014 00:47 IST2014-09-18T00:47:40+5:302014-09-18T00:47:40+5:30
गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो.

माणसाला सुसंगतीची गरज
मुनीश्री सुवीरसागर महाराज यांचे विचार
नागपूर : गुन्ह्यांच्या वाढलेल्या घटना या कुसंगतीचा परिणाम आहे. माणूस जशा वातावरणात वावरतो, तसा तो घडतो. तुमची संगत जर वाईटांशी असेल, तर तुमच्या स्वभावात, कृतीत, व्यवहारात त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आपले कुटुंब, समाज आणि हे राष्ट्र सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने चांगली संगत करावी. आज समाजात जी परिस्थिती आहे, ती लक्षात घेता, प्रत्येकाला सुसंगतीची गरज आहे, असे उद्बोधन मुनीश्री सुवीरसागर महाराज यांनी चिटणीस पार्क येथे सुरू असलेल्या प्रवचनमालेत केले. प्रवचनमालेत ‘सद्संगती से सदगती’ या विषयावर त्यांनी श्रावकांना उद्बोधित केले.
श्री सैतवाळ जैन संघटन मंडळातर्फे मुनीश्री सुवीरसागरजी महाराज यांच्या प्रवचनमालेला सुरुवात झाली आहे. या प्रवचनमालेत दुसरे पुष्प त्यांनी गुंफले. यात त्यांनी सुसंगतीवर आपले विचार मांडले. ते म्हणाले की, मनुष्य चुकीच्या संगतीत असेल तर तो राक्षस बनतो. मात्र चांगली संगत त्याला देवरूप प्राप्त करून देऊ शकते. जगण्यातील साधेपणामुळे विचारात पवित्रता येते. साध्या वागण्यातून अधिक सुखाची प्राप्ती होते. आजचे युग आकर्षित करणारे आहे, जरा काही वेगळे दिसले, त्याच्या मोहात पडतो आहे. त्याचा परिणाम महिलांच्या पेहराव्यावर झाला आहे. पेहराव्यामुळे महिलांकडे वाईट नजरेने बघितले जाते. मात्र यात आपली मुलगी, घरची कुणीतरी स्त्री असेल, याचा विचार केला जात नाही. तरीही घरातूनच स्त्रियांना साध्या पेहराव्यासाठी आग्रह होणे गरजेचे आहे. बालपणी चांगले संस्कार झाल्यास, त्याचे चरित्र चांगले बनते, असे मुनीश्री म्हणाले. त्यांनी सेवा परम कर्तव्य यावरही उद्बोधन केले.
मोठ्या संख्येने श्रावकांनी प्रवचनाचा लाभ घेतला. प्रवचनाला प्रमुख अतिथी म्हणून आ. दीनानाथ पडोळे, पोलीस उपायुक्त अरुण जगताप, नगरसेवक बंडू राऊत, कुलभूषण डहाळे, सुनील जैन, हिराचंद मिश्रीकोटकर, संतोष जैन, डॉ. विनय रोडे, कमलकांत गोंदवाले, कुणाल गडेकर, नीरज पळसापुरे, अमोल बंड, महावीर मिश्रीकोटकर, विजय सोईतकर आदी उपस्थित होते.