पवारांनाच हवीय सिंचन घोटाळ्याची माहिती!
By Admin | Updated: June 5, 2015 01:48 IST2015-06-05T01:48:30+5:302015-06-05T01:48:30+5:30
बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना शासनाकडूनच माहिती हवी आहे.
पवारांनाच हवीय सिंचन घोटाळ्याची माहिती!
मुंबई : बहुचर्चित सिंचन घोटाळ्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी माजी जलसंपदा मंत्री अजित पवार यांना शासनाकडूनच माहिती हवी आहे. त्यासाठी त्यांनी माहिती अधिकार कायद्यांतर्गत तसा अर्जही जलसंपदा विभागाकडे केला असल्याचे समजते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सिंचन घोटाळाप्रकरणी माजी मंत्र अजित पवार यांच्यासह सुनील तटकरे यांची एसीबीमार्फत चौकशी सुरू आहे. मात्र, दोन्ही माजी मंत्र्यांना चौकशीसाठी प्रत्यक्ष कार्यालयात हजर न राहाता वकिलामार्फत आपले म्हणणे सादर करण्याची मुभा एसीबीने दिली आहे. त्यावरून बरीच उलट-सुलट चर्चा होत आहे. निवडणुकीपूर्वी सिंचन घोटाळ्यावरून रान उठवणाऱ्या भाजपा अजित पवारांना पाठिशी घालत असल्याचेही वृत्त आहे.
अजित पवारांना या घोटाळ्याप्रकरणी अद्याप आरोपी बनविण्यात आले नसल्याने त्यांच्या एसीबी कार्यालयात उपस्थित राहण्याची सक्ती करता येत नाही, असे एसीबीचे म्हणणे आहे. याबाबत एसीबीचे पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित म्हणाले, यांना विचारले असता ते म्हणाले, अजित पवार यांची नियमानुसार चौकशी सुरू आहे. त्यांना प्रश्नावलीही पाठविण्यात आली आहे. मात्र उत्तरे देण्यासाठी त्यांना काही माहिती हवी असून त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात अर्ज केला आहे. त्यानंतर ते त्यांची माहिती आम्हाला देतील. त्यांचे म्हणणे सादर झाल्यानंतर सगळी माहिती न्यायालयापुढे सादर केली जाईल, असेही दीक्षित म्हणाले. राज्य सहकारी बँकेच्या चौकशीत देखील ज्या संचालकांना नोटीसा पाठवल्या आहेत त्यांना त्यांचे म्हणणे वकिलामार्फत मांडण्यास अडकाठी केलेली नाही, अशी माहिती सहकार विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. (विशेष प्रतिनिधी)