पवारांकडून पराभवाचा पंचनामा
By Admin | Updated: November 19, 2014 04:59 IST2014-11-19T04:59:35+5:302014-11-19T04:59:35+5:30
लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ

पवारांकडून पराभवाचा पंचनामा
चोंढी (अलिबाग) : लोकप्रतिनिधींचा कमी झालेला संपर्क, नेत्यांवर झालेले प्रचंड आरोप, मध्यमवर्गीय मतदारांनी पक्षाकडे फिरविलेली पाठ आणि मुस्लीम-दलित-आदिवासी-धनगर समाजाने योग्य साथ न दिल्यामुळे विधानसभा निवडणुकीत पक्षाला पराभवाचा सामना करावा लागला, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पराभवाचा पंचनामा आज केला.
पराभवाचे चिंतन आणि भविष्याचा वेध घेण्यासाठी आयोजित पक्षाच्या बैठकीत ते बोलत होते. पवार पुढे म्हणाले, विदर्भ, मुंबई शहर आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत अपेक्षित यश मिळाले नाही. जळगावमध्ये ४वरून एका आमदारावर आलो. भ्रष्टाचाराच्या आरोपावरून आमचे एक आमदार जेलमध्ये होते. त्या प्रतिमेचा फटका बसला.
धनगर समाजाच्या आरक्षणाला राष्ट्रवादीचा विरोध नव्हता पण तसे चित्र निर्माण करण्यात विरोधक यशस्वी झाले. मध्यमवर्गीयांची संख्या अधिक असलेल्या मुंबई, पुणे, नागपुरात आम्हाला मोठा फटका बसला. आघाडी ऐनवेळी तुटली तरी स्वबळावर लढण्याची शक्यता तपासून आम्ही तशी तयारी करून ठेवायला हवी होती पण तसे घडले नाही. पक्षाच्या आमदार, खासदारांनी आपल्या मतदारसंघाव्यतिरिक्त एका मतदारसंघात पक्षवाढीच्या दृष्टीने लक्ष घालावे, असे आदेश पवार यांनी दिले.
आ. राहुल नार्वेकर यांच्या अलिशान रिसोर्टवर बैठकीची व्यवस्था आहे. नेत्यांच्या मनोरंजनासाठी रात्री ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ही झाला. गेल्या वेळी राष्ट्रवादीची बैठक येथेच एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये झाली होती. (विशेष प्रतिनिधी)