एसटी बंद केल्याने प्रवासी त्रस्त

By Admin | Updated: July 20, 2016 03:25 IST2016-07-20T03:25:46+5:302016-07-20T03:25:46+5:30

श्रीवर्धन आगरातून मुंबई, नालासोपारा, भांडुप तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात.

Passengers suffer from the shutting down of the bus | एसटी बंद केल्याने प्रवासी त्रस्त

एसटी बंद केल्याने प्रवासी त्रस्त


बोर्ली पंचतन : श्रीवर्धन आगरातून मुंबई, नालासोपारा, भांडुप तसेच राज्याच्या अनेक ठिकाणी बसेस जातात. मात्र आठवडाभरापासून एसटी बंद असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे.
काही दिवसांपूर्वी श्रीवर्धन तालुक्यातील सर्वे, नानेवली, आदगाव व वेळास या परिसरातून मुंबईसाठी एसटी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. आधी ही एसटी सुरू होती. मात्र ती बंद केल्याने प्रवाशांचा संताप होत आहे.
बोर्लीपंचतन व दिघी परिसरातून मुंबईकडे जाण्यासाठी प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. ठाण्यावरून सकाळी सहा वाजता सुटणारी ठाणे- दिवेआगर एसटी गेल्या चार दिवसांपासून येतच नाही. याबाबत विचारणा केली असता ही गाडी बंद करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
श्रीवर्धन -बोर्ली-भांडुप ही गाडी चार दिवसांपासून आलेली नाही. याशिवाय लोकल एसटीही उशिराने धावत आहेत.
ऐन पावसाळ्यात प्रवाशांचे हाल होत असून बंद करण्यात आलेल्या बसचा सर्वाधिक फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. त्यांना खासगी वाहनांशिवाय पर्याय राहिला नाही.
प्रवासी संख्या कमी असल्याने एसटी बंद करण्यात आली आहे. कमी प्रवाशांसाठी बस कशी चालवणार? येत्या काही दिवसात बंद केलेल्या बस पुन्हा सुरू केल्या जातील. बस सुरू करण्याअगोदर प्रवाशांना कळवले जाईल.
- सी. पी. देवधर, श्रीवर्धन आगार प्रमुख.

Web Title: Passengers suffer from the shutting down of the bus