पक्ष आणि संघटनेची लागणार कसोटी
By Admin | Updated: May 25, 2014 00:46 IST2014-05-25T00:46:38+5:302014-05-25T00:46:38+5:30
विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. निवडणुकीला फक्त २५ दिवस उरले आहेत. एवढय़ा कमी काळात सहा जिल्ह्यात पसरलेल्या मतदारांपर्यंत

पक्ष आणि संघटनेची लागणार कसोटी
पदवीधर निवडणूक : सहा जिल्ह्यात पोहचण्याचे आव्हान नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघाची निवडणूक २0 जून रोजी होत आहे. निवडणुकीला फक्त २५ दिवस उरले आहेत. एवढय़ा कमी काळात सहा जिल्ह्यात पसरलेल्या मतदारांपर्यंत पोहचताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. उमेदवारी देणारा पक्ष व आपल्या नेत्यासाठी काम करणार्या शिक्षक, कर्मचारी व सामाजिक संघटना यांचीही या निवडणुकीत कसोटी लागणार आहे. पदवीधरसाठी भाजपने महापौर अनिल सोले यांची उमेदवारी जाहीर केली असली तरी अद्याप कुणालाही निवडणूक प्रभारी नेमलेले नाही. राष्ट्रीय नेते खा. नितीन गडकरी व प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत. २६ ला नरेंद मोदी यांचा थपथविधी आहे. २७ तारखेला नेते नागपुरात येतील.त्यानंतर २८ तारखेला भाजप प्रचाराचा नारळ फोडणार आहे. असे असले तरी महापौर अनिल सोले मतदार भेटींच्या कामी लागले आहेत. सहाही जिल्ह्यात पक्ष संघटनेचे नेटवर्क आहे. पक्षाचे कार्यकर्ते आहेत. एखाद्या सार्वत्रिक निवडणूकीसारखीच ही निवडणूकही कार्यकर्ते लढतील, असा पक्षाला विश्वास आहे. डॉ. बबनराव तायवाडे यांच्या प्रचारात काँग्रेसची पक्षसंघटना पाहिजे त्या प्रमाणात उतरल्याचे दिसत नाही. गेल्या निवडणुकीचा अनुभव असल्यामुळे तायवाडे यांनी आपले व्यक्तिगत नेटवर्क तगडे केले आहे. शिक्षक, कर्मचारी संघटनांसह विविध सामाजिक संघटनांना कामी लावले आहे. गेल्या निवडणुकीत तायवाडे यांच्या प्रचारासाठी माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बराच वेळ दिला होता. यावेळी ही जबाबदारी कोण पार पाडेल, याकडे लक्ष लागले आहे. शाहु, फुले, आंबेडकर पदवीधर संघटनेकडून रिंगणात उतरणार असलेले माजी सनदी अधिकारी किशोर गजभिये यांनीही सहाही जिल्ह्यात दौरे सुरू केले आहेत. पहिल्याच दिवशी २७ तारखेला सकाळी ११ वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. लोकसभा निवडणुकीतील विजयामुळे भाजप कार्यकर्ते उत्साहात आहेत. तर लोकसभेनंतर होत असलेली ही पहिली निवडणूक असल्यामुळे पराभवाचा डाग पुसून भाजपपुढे आव्हान कायम ठेवण्यासाठी काँग्रेससाठी ही एक चांगली संधी आहे. सध्याचे चित्र पाहता तिरंगी लढतीची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)