जलबचतीत शासकीय कार्यालयांचा सहभाग
By Admin | Updated: May 30, 2016 03:38 IST2016-05-30T03:38:34+5:302016-05-30T03:38:34+5:30
पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर उपाय म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या पाणीबचत आणि संवर्धनाच्या मोहिमेला आता शासकीय कार्यालयांमधून प्रतिसाद मिळत आहे.

जलबचतीत शासकीय कार्यालयांचा सहभाग
मुंबई : राज्यात खोल गेलेल्या पाणीपातळीमुळे निर्माण झालेल्या पाणीप्रश्नावर उपाय म्हणून ‘लोकमत’ने सुरू केलेल्या पाणीबचत आणि संवर्धनाच्या मोहिमेला आता शासकीय कार्यालयांमधून प्रतिसाद मिळत आहे. जळगावमधील १७ मजली महापालिकेच्या भव्य इमारतीतील पाणीगळती रोखण्यासाठी स्थानिक प्लंबर असोसिएशनने पुढाकार घेऊन नळाच्या तोट्या बदलून गळती पूर्णपणे बंद केली.
शहरांमधील वाढते नागरीकरण आणि पावसाच्या लहरीपणामुळे राज्यातील जलसाठे अपुरे पडत असल्यामुळे गेल्या तीन-चार वर्षांत पाण्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. या कठीण परिस्थितीशी सामना करण्यासाठी आणि भविष्यात पाण्याची टंचाई जाणवू नये यासाठी जलसाक्षरता आणि पाण्याच्या उपयुक्ततेविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागरण करण्यासाठी ‘लोकमत’ने सुरू केलेल्या जलमित्र अभियानाला लोकांचा जोरदार पाठिंबा आणि प्रतिसाद मिळत आहे.
या पार्श्वभूमीवर जळगावमधील महापालिका प्रशासनाने पाणीगळतीमुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी नळांच्या तोट्या बदलण्याचे ठरविले.
पालिकेच्या या निर्णयाला प्रतिसाद म्हणून येथील प्लंबर्स असोसिएशनने हे मोफत करून देण्याचे ठरविले. सुमारे ३५ ते ४० जणांच्या चमूने दोन दिवस हे काम केल्याने लाखो लिटर्स पाण्याची बचत होत असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष अशोक पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
>आपणही हे करू शकता...
घरातील लहान मुलांमध्ये नळाच्या तोट्या बंद करण्याविषयी जनजागृती करा
घरातील प्राण्यांसमोर ठेवलेले शिळे पाणी टाकून न देता झाडाला घाला.
घरगुती उपकरणे घेताना अधिक पाणी बचत करणारी घ्या. (उदा. रेफ्रिजरेटर, कूलर आदी)
जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस मुख्यालय आणि नगरपालिका किंवा महापालिकांची कार्यालये असतात. दिवसभर या ठिकाणी कामासाठी नागरिकांची ये-जा असते. अशा कार्यालयांमधील पाणीगळती रोखून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प केल्यास लाखो लीटर पाणी वाचेल आणि तेवढेच पाणी पावसाळ्यात जमिनीत मुरल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची बचत होऊ शकते.
भविष्यात सर्वांना पाणी उपलब्ध होण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. सरकारच्या प्रयत्नांबरोबरच नागरिकांनीदेखील पाणी बचत करण्यासाठी छोटे आणि घरगुती उपाय करायला हवेत. यासाठी नामांकित खेळाडूंनीही पुढाकार घेऊन जनजागृती करावी.
- प्रार्थना ठोंबरे, आंतरराष्ट्रीय मानांकित टेनिसपटू