पुण्यातून निघालेली पंढरपूर वारी सध्या फलटण परिसरात विसावली आहे. राज्याच्या विविध भागातून वारी घेऊन वारकरी मार्गस्थ झाले आहेत. हे वारकरी येण्यापूर्वीच पंढरपुरात वैष्णवजन गोळा झालेले आहेत. आषाढी एकादशीला अजून ७ दिवस बाकी असताना विठ्ठलाच्या दर्शनासाठी चार-चार किमीच्या रांगा लागल्या आहेत.
आषाढी एकादशीच्या सोहळ्याला अजून ७ दिवसाचा अवधी आहे. अशातच पंढरपुरात विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शन रांगेत ५० हजार भाविक उभे आहेत. विठूदर्शनासाठी सध्या १० तासांचा कालावधी लागत आहे. तरीही भाविकांची विठ्ठलदर्शनाची ओढ दिसून येत आहे.
प्रत्येकाला विठ्ठलाचे दर्शन घेण्याची इच्छा आहे. यातूनच दर्शन रांग ४ किमी लांब पर्यंत जाऊन पोहोचलेली आहे. देशभरातून विठ्ठल भक्त मार्गस्थ झाले आहेत. यंदा विक्रमी वैष्णवजन पंढरीत दाखल होण्याची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर प्रशासन याच्या तयारीत गुंतले आहे. वारकऱ्यांना वाटेत गावकरी जेवण, चहापान, राहण्याची व्यवस्था करत आहेत. पावसाने थोडी उसंत दिल्याने वारकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.