शेतक-यांना पॅकेज द्या - कॉँग्रेस
By Admin | Updated: December 8, 2014 02:53 IST2014-12-08T02:53:08+5:302014-12-08T02:53:08+5:30
विदर्भ-मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातून गेले. धानही करपले. कापसाचे उत्पादनही कमी झाले आहे.

शेतक-यांना पॅकेज द्या - कॉँग्रेस
नागपूर : विदर्भ-मराठवाडा दुष्काळाने होरपळून निघाला आहे. अपुऱ्या पावसामुळे सोयाबीनचे पीक हातून गेले. धानही करपले. कापसाचे उत्पादनही कमी झाले आहे. ऊसाला योग्य भाव मिळालेला नाही. बहुतांश गावांची आणेवारी चुकीची काढलेली आहे. शेतकरी संकटात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र मंत्रिमंडळ निश्चित करण्यात रममाण होते. आता ते केंद्राकडे ४५०० कोटींचे पॅकेज मागितल्याचे सांगत आहेत, पण राज्य सरकार म्हणून भूमिका जाहीर करीत नाही, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केली.
शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी कोरडवाहूसाठी हेक्टरी २५ हजार रुपये व ओलितासाठी हेक्टरी ५० हजार रुपयांचे पॅकेज जाहीर करावे. तसेच विदर्भातील प्रश्नांना न्याय मिळण्यासाठी अधिवेशन एक महिना चालण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी काँग्रेसचे विधानसभेतील गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, उपनेते आ. विजय वडेट्टीवार,माजी खा. विलास मुत्तेमवार, माजी मंत्री नितीन राऊत, सतीश चतुर्वेदी, आ. सजंय दत्त, जिल्हाध्यक्ष सुनीता गावंडे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा आदी उपस्थित होते.
विदर्भाबाबत केंद्रीय
काँग्रेसच्या भूमिकेची प्रतीक्षा
राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल सादर केला आहे. या अहवालावर केंद्रीय काँग्रेसने आपली भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही. विदर्भाबाबत केंद्रीय काँग्रेसची जी भूमिका असेल तीच भूमिका प्रदेश काँग्रेसची असेल, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)