प्रवासी सुरक्षा सायडिंगला
By Admin | Updated: August 25, 2014 03:36 IST2014-08-25T03:36:04+5:302014-08-25T03:36:04+5:30
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही.

प्रवासी सुरक्षा सायडिंगला
जयंत धुळप, अलिबाग
मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे या दोघांच्या सीमांसंदर्भात कोकण रेल्वेच्या प्रारंभापासूनच असणाऱ्या समस्यांवर केंद्रीय रेल्वे प्रशासनाने कधीही गांभीर्याने विचार केला नाही. कोकण रेल्वे पोलीस दल आणि कोकण रेल्वे आपत्ती नियंत्रण यंत्रणा अस्तित्वातच आली नसल्याने गेल्या तब्बल ११ वर्षांच्या कालावधीत कोकण रेल्वेमार्गावर तीन गंभीर अपघात झाले होते. रेल्वे अपघातात एकूण ९० प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत, तर ४००च्या वर प्रवासी गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांना कोकणातील जिल्ह्यांतील जिल्हा प्रशासनांकडून ‘जिल्हा आपत्ती निवारण आराखडा’ तयार करण्याच्या प्रक्रियेकरिता सातत्याने बोलावून देखील ते कधीही येत नाहीत व सहकार्य देखील करीत नाहीत, ज्यामुळे मदतकार्यात मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी रेल्वे अपघात आपत्ती नियंत्रण योजना देखील कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून अस्तित्वात येऊ शकलेली नाही. मुळात मध्य आणि कोकण रेल्वे हद्दीबाबत मोठा वाद आहे. त्यावर तोडगा निघत नसल्याने सातत्याने प्रवासी सुरक्षा साइड ट्रॅकला पडत असल्याचे दिसून येते.