अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, उद्धव ठाकरेंचा टोला
By Admin | Updated: September 8, 2016 07:33 IST2016-09-08T07:33:22+5:302016-09-08T07:33:22+5:30
अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे

अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, उद्धव ठाकरेंचा टोला
>- ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जणांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? दुसर्यांवरील अन्याय हा स्वत:साठी न्याय व दुसर्यांना मिळालेला न्याय हा स्वत:वरील अन्याय ठरतो तेव्हा राज्याचे मानसिक संतुलन बिघडले असे समजायला हवे असा टोला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून लगावला आहे.
तामीळनाडूविरोधात व खासकरून सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात कानडी बांधवांनी जो हिंसक लुंगी डान्स सुरू केला त्याचा काय अर्थ घ्यावा? तामीळनाडूस त्यांच्या वाट्याचे पाणी दिल्याने कर्नाटकवर अन्याय झाल्याची भावना आहे. चला, यानिमित्ताने अन्याय काय असतो ते आमच्या कानडी बांधवांना समजले, पण मग गेली पन्नासेक वर्षे हेच कानडी बांधव सीमा भागातील मराठी जनांवर जे भयंकर अत्याचार करीत आहेत त्याला काय म्हणायचे? हे अत्याचार अन्यायाच्या कोणत्या परिभाषेत बसतात? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.
कर्नाटक सरकार व कानडी जनता मराठी बांधवांना ‘दुष्मनां’ची पोरे समजून वर्षानुवर्षे चिरडत, भरडत आहे. मराठी शाळा, मराठी पाट्यांवर अन्यायाचे हातोडे मारून मुस्कटदाबीचा कहर करीत आहे. मराठी भाषेवर तिथे एक प्रकारे सरकारी बंदी आणून जो अत्याचार चालवला आहे तो सर्वच प्रकार अन्यायाचे शिखर आहे, पण तामीळनाडूस पाणी दिले हा ज्या कानडी बांधवांना अन्याय वाटतो त्यांना मराठी जनांचे सांडलेले रक्त हा अन्याय वाटू नये हे ढोंगच म्हणावे लागेल. पाण्यासाठी भांडणार्यांना न्यायासाठी सांडलेल्या रक्ताचे मोल वाटू नये याचे आश्चर्य वाटते असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.
कर्नाटकात पाणी पेटले आहे. त्याच कर्नाटकच्या सीमा भागात गेली पन्नास वर्षे कानडी अन्यायाविरोधात मराठी जनांची मने व मनगटे पेटली आहेत. हा अन्याय करणारे कानडी बांधवच आहेत. मात्र त्यांनी कावेरी पाणीवाटपात अन्याय झाला म्हणून सर्वोच्च न्यायालय व तामीळनाडूविरोधात लुंग्या झटकून हिंसाचार सुरू केला आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयाने २० लाख सीमा बांधवांना न्याय देणारा निर्णय दिला तर ‘हा अन्याय आहे हो!’ असे सांगून पेटवापेटवीचा असाच ‘न्याय्य’ मार्ग स्वीकारायला हे लोक कमी करणार नाहीत असंही उद्धव ठाकरे बोलले आहेत.