माळढोकच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीवर भर
By Admin | Updated: June 19, 2014 00:56 IST2014-06-19T00:56:16+5:302014-06-19T00:56:16+5:30
जगातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. माळढोक पक्षाच्या संख्येत वाढ होत आहे. माळढोक पक्षी शेतातील किडे फस्त करीत असल्यामुळे

माळढोकच्या संवर्धनासाठी सेंद्रिय शेतीवर भर
वनविभागाचा प्रयत्न : चार गावांतील शेतकरी देणार प्रतिसाद
प्रविण खिरटकर - वरोरा
जगातील अत्यंत दुर्मिळ समजला जाणारा माळढोक पक्षी वरोरा तालुक्यात मागील दहा वर्षांपासून वास्तव्यास आहे. माळढोक पक्षाच्या संख्येत वाढ होत आहे. माळढोक पक्षी शेतातील किडे फस्त करीत असल्यामुळे शेतात रासायनिक खत व किटकनाशकाचा उपयोग केल्यास माळढोक पक्षावर विपरित परिणाम होऊन ते नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात होती.
त्यामुळे वनविभाग व वरोरा तालुक्यातील चार गावांतील शेतकऱ्यांनी माळढोक पक्षाच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकीत माळढोक पक्षाचा वावर असणाऱ्या शेतात सेंद्रीय खताचा वापर करून पिके घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माळढोक पक्षाला पोषक वातावरण तयार होणार असल्याचे मानले जात आहे.
शेतकऱ्यांचे मित्र समजले जाणारे माळढोक पक्षी सन २००४ मध्ये वरोरा तालुक्यात चारच्या संख्येने आढळून आले होते. जगात अत्यंत दुर्मिळ झालेल्या माळढोक पक्षाने महाराष्ट्रातील सोलापूरनजिकच्या नानज गावाच्या क्षेत्रात सर्वाधिक असल्याची नोंद आहे. परंतु नानज परिसरात माळढोक पक्ष्यांची संख्या रोडावली असल्याचे समजते. माळढोक पक्षाच्या संख्येत वरोरा तालुक्यात दिवसागणीक वाढ होत आहे. सध्या वरोरा तालुक्यात सात माळढोक पक्षी आहेत.
त्यामध्ये पाच मादी व दोन नरांचा समावेश आहे. या वर्षीच्या प्रगणनेत ते आढळून आले होते. माळढोक पक्षी उन्हाळ्यामध्ये दिसत नाही. त्याचे बाराही महिने लोकेशन मिळावे, याकरिता डेहराडून येथील संस्थेने एका माळढोक पक्षाला प्रायोगिक तत्वावर रेडीयो कॉलर चिप लावण्यात आली. माळढोक पक्ष्याचे संवर्धन व्हावे. माळढोक पक्ष्याचा वावर असलेल्या शेतशिवारातील शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, याकरिता वनविभाग शेतकऱ्यांना नेहमी मार्गदर्शन व प्रोत्साहित करीत असतात. माळढोक पक्षाचे अंडे शेतात आढळल्यास अशा शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांकडून अंड्याचे जतन करण्याकरिता प्रोत्साहन भत्ता दिला जातो.
सध्या शेतात मोठ्या प्रमाणात रासायनिक खताचा व किटकनाशक औषधांचा वापर केला जात आहे. माळढोक पक्षी शेतात वावरत असतो व पिकातील किटक खात असतो. त्यामुळे त्याच्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वन विभागाने वरोरा तालुक्यातील तुलाना, मार्डा, कळमजा, वनोजा या चार गावांतील शेतकऱ्यांसोबत सेंद्रीय खताने शेती करण्याकरिता चर्चा केली. या चर्चेत शेतकऱ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद आल्याने सेंद्रीय खतासाठी शेतकऱ्यांना सामूहिकरित्या अनुदान देण्यात आले आहे. गावालगत गांढुळ खताची निर्मिती करण्यात येणार आहे. गांढुळ खत व शेणखत शेतात घालून पिके घेतली जाणार आहे. सेंद्रिय खताने पिके घेतल्याने माळढोक पक्ष्यास कुठलाही धोका पोहोचणार नसून त्यांचे आयुष्यमान वाढणार असल्याचे मानले जात आहे.
सेंद्रीय खताचा वापर करण्याकरिता अधिकाअधिक शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम सुरू आहे. यामध्ये सर्व शेतकरी सहभागी होतील, असा मानस वनपरिमंडळ अधिकारी बी.टी. लालसरे यांनी व्यक्त केला.