१० टप्प्यांत होणार ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’
By Admin | Updated: August 26, 2014 01:06 IST2014-08-26T01:06:51+5:302014-08-26T01:06:51+5:30
मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’

१० टप्प्यांत होणार ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’
लवकरच निविदा : साडेचार वर्षांत साकारणार
नागपूर : मेट्रो रेल्वे, पारडी उड्डाणपूल या दोन महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिंपूजन केल्यानंतर, आता महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी वर्धा रोड ते जयताळादरम्यान प्रस्तावित असलेल्या ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’ प्रकल्पावर लक्ष केंद्रित केले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीने सोमवारी या प्रकल्पाला प्रशासकीय मंजुरी दिली. दहा टप्प्यात या प्रकल्पाचे काम केले जाईल. यासाठी साडेचार वर्षे लागतील. लवकरच यासाठी निविदा जारी केल्या जातील. त्यामुळे या प्रकल्पाने आता एक पाऊल पुढे टाकले आहे.
या प्रकल्पासाठी निविदा काढण्यापासून ते प्रक्रिया पूर्ण करण्याचे अधिकार आयुक्तांना देण्याचा निर्णय घेतला. सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत ‘आॅरेंज सिटी स्ट्रीट’चा प्रस्ताव ठेवण्यात आला. या योजनेचा डीपीआर (विस्तृत प्रकल्प अहवाल तयार केला जाईल. पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) या आधारावर प्रकल्प साकारला जाईल. मौजा सोमलवाडा, खामला भामटी, टाकळी व जयताळा येथील ३१.१५ हेक्टर जमिनीचा महापालिकेला ताबा मिळाला आहे. यातील काही जमीन संरक्षण विभागाची आहे. प्रकल्पाचा अहवाल आर्किटेक्ट हफीज कॉन्ट्रॅक्टर यांनी तयार केला आहे. हा प्रकल्प ५.५० किलोमीटर लांब व ३६ ते १०० मीटर रुंद जागेवर साकारला जाईल. प्रकल्पांतर्गत वाणिज्यिक, निवासी, सामाजिक, शैक्षणिक व कार्यालयीन उपयोगासाठी सुविधा विकसित केल्या जातील. महापालिकेचे अधीक्षक अभियंता उराडे यांनी सांगितले की, संबंधित प्रकल्प प्राथमिकस्तरावर आहे. याचा डीपीआर तयार करून वेगवेगळ्या मुद्यांवर प्रकाश टाकला जाईल; कायदेशीर सल्लादेखील घेतला जाईल. (प्रतिनिधी)
असा साकारणार प्रकल्प
दहा टप्प्यात या प्रकल्पाचा विकास केला जाईल. पहिल्या टप्प्यात हॉस्पिटॅलिटी, दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यात निवासी, चौथ्या व पाचव्या टप्प्यात हॉस्पिटल व निवासी सुविधा, सहाव्या टप्प्यात महापालिकेतर्फे विविध विकास कामे, सातव्या टप्प्यात निवासी तसेच शेवटच्या तीन टप्प्यात वाणिज्यिक, कार्यालयीन व कन्व्हेन्शन सेंटर आदीचे काम केले जाईल, असे बोरकर यांनी स्पष्ट केले.
४,६२७ कोटींचा खर्च
बोरकर यांच्यानुसार प्रकल्पासाठी ४,६२७ कोटी रुपयांचा खर्च येईल. यापासून ५,३०७ कोटींचे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. यापासून महापालिकेला साडेचार वर्षांत ६५४.५० कोटींचे उत्पन्न मिळेल. याशिवाय सार्वजनिक हिताच्या विकास कामांसाठी १३२.२३ कोटी व इतर विकास कामांवर ७८.२७ कोटी रुपये खर्च केले जातील.