भेदाभेदाचा आक्षेप घेत द्वादशीवार यांना विरोध; मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2022 06:04 IST2022-10-14T06:04:02+5:302022-10-14T06:04:08+5:30

अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी द्वादशीवार यांच्या उमेदवारीस विरोध करणारे पत्रक जारी केले आहे.

Opposition to Dwadashiwar objecting to discrimination; Election of Marathi Literature Conference President | भेदाभेदाचा आक्षेप घेत द्वादशीवार यांना विरोध; मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवड

भेदाभेदाचा आक्षेप घेत द्वादशीवार यांना विरोध; मराठी साहित्य संमेलनाध्यक्ष निवड

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बहुतांश ललित साहित्यिक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते, असे वक्तव्य केल्याने लेखक व ज्येष्ठ संपादक प्रा. सुरेश द्वादशीवार यांचा अखिल भारतीय साहित्य परिषदेने निषेध केला आहे. द्वेषमूलक भाषणे करणाऱ्या आणि मते असणाऱ्या साहित्यिकांना साहित्य संमेलनाचे अध्यक्ष केले जाऊ नये, असे अखिल भारतीय साहित्य परिषदेने पत्रात म्हटले आहे. 

वर्धा येथे होणाऱ्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ज्येष्ठ संपादक, साहित्यिक सुरेश द्वादशीवार, लेखक अच्युत गोडबोले आणि ज्येष्ठ कवी प्रा. प्रवीण दवणे यांची नावे सुचविलेली आहेत. गोवा, फोंडा येथे  शनिवारी (१५ ऑक्टोबर) होणाऱ्या बैठकीत एकमताने अध्यक्षपदाची निवड होणार आहे. अध्यक्षपदाच्या स्पर्धेत असणाऱ्या द्वादशीवार यांच्या वक्तव्याबाबत साहित्य परिषदेने तीव्र नाराजी व्यक्त केली. आपल्यातील जात, धर्म यांचे भेदाभेद मिटवून आपण एकत्र आले पाहिजे, असा लोकांना उपदेश करणाऱ्या द्वादशीवार यांनी दक्षिणायनच्या नागपूर येथील कार्यक्रमातील भाषणात मात्र भेदभावाला खतपाणीच घातले आहे. मराठीतील बहुतांश ललित लेखक हे ब्राह्मण होते, ललित साहित्याचे बहुतांश लेखक हे उच्चवर्णीय होते. त्यामुळे त्यांच्यावर सावरकरांच्या विचारांचा पगडा असल्याने ते गांधी विरोधी होते आणि त्यांनी महात्मा गांधींना न्याय दिला नाही, हे त्यांचे वक्तव्य वर्णभेद निर्माण करणारे, भावना भडकावून दुही माजवणारे, असे परिषदेचे म्हणणे आहे. अखिल भारतीय साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. नरेंद्र पाठक यांनी द्वादशीवार यांच्या उमेदवारीस विरोध करणारे पत्रक जारी केले आहे.

साहित्य समाजाला जोडण्यासाठी 
     आपल्या भाषणात द्वादशीवार यांनी खांडेकर ते प्र. के. अत्रे यांच्यापर्यंत अनेकांची निंदा करीत न्यायालयांवरही टीका केल्याचे परिषदेने म्हटले आहे.
    समाजातील भेदांना उत्तेजन देणाऱ्यांचा निषेध करत आहे, असे पाठक म्हणाले. साहित्याचा उद्देश समाज तोडणे नसून समाज जोडणे आहे, हे विसरून चालणार नाही. 
     साहित्य संमेलनाचा अध्यक्षच जर भेदाला उत्तेजन देणारा असेल तर ते साहित्य संमेलन समाजाला कोणती दिशा दाखवणारे असेल, असा सवाल पाठक यांनी परिषदेच्या वतीने केला आहे. 

Web Title: Opposition to Dwadashiwar objecting to discrimination; Election of Marathi Literature Conference President