कृषी विद्यापीठ विभाजनास विरोध
By Admin | Updated: August 11, 2015 01:26 IST2015-08-11T01:26:07+5:302015-08-11T01:26:07+5:30
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांवर विभाजनाची टांगती तलवार कायम असून, त्यास विद्यार्थी व अधिकाऱ्यांचाच तीव्र विरोध होत आहे. विद्यापीठ विभाजनाच्या

कृषी विद्यापीठ विभाजनास विरोध
राहुरी (अहमदनगर) : राजकीय हस्तक्षेपामुळे राज्यातील कृषी विद्यापीठांवर विभाजनाची टांगती तलवार कायम असून, त्यास विद्यार्थी व अधिकाऱ्यांचाच तीव्र विरोध होत आहे. विद्यापीठ विभाजनाच्या पहिल्या समितीला विरोध झाला होता़ दुसरी समिती सप्टेंबरमध्ये राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाला भेट देऊन अहवाल तयार करणार आहे़
परभणी येथील वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ़ बी़ व्यंकटेश्वरलु यांच्या अध्यक्षतेखालील दुसरी समिती विद्यापीठ विभाजनाचा आढावा घेणार आहे़ समितीमध्ये चार कृषी विद्यापीठाचे शिक्षण संचालक, कुलसचिव यांचा समावेश आहे़ वाय़ पी़ एस़ थोराज यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या पहिल्या समितीचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता़ त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू यांनी विभाजनाला विरोध दर्शविला होता़
राज्यात महात्मा फुले, वसंतराव नाईक, पंजाबराव देशमुख व बाळासाहेब सावंत यांच्या नावाची चार कृषी विद्यापीठे आहेत़अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्व विदर्भाचा विकास व्हावा म्हणून स्वतंत्र कृषी विद्यापीठाची मागणी केली होती़ अकोले विद्यापीठाचे विभाजन करण्यावर विधानसभेत चर्चा झाली होती़
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राहुरी विद्यापीठाचे विभाजन करण्यास हिरवा कंदील दाखविला होता़ अकोले विद्यापीठात अकरा तर राहुरी विद्यापीठांतर्गत दहा जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र आहे़
देवेंद्र फडवणीस यांचे मूल हे जन्मगाव आहे़ अकोले विद्यापीठाचे विभाजन होऊन मूल येथे विद्यापीठ मंजूर झाल्यास मुख्यमंत्र्यांची ती मूलकरांना भेट असेल. तर एकनाथ खडसे हे जळगावला कृषी विद्यापीठ स्थापन करण्यास इच्छुक आहेत.
विद्यापीठ विभाजनासाठी नेमलेल्या पहिल्या समितीला विद्यार्थ्यांनी मोठा विरोध केला होता़ आता दुसरी समिती सप्टेंबरमध्ये येणार आहे़ समिती राज्य सरकारला अहवाल देईल़ त्यानंतर सरकार विभाजनाबाबत निर्णय घेईल़
- डॉ़ तुकाराम मोरे,
कुलगुरु, राहुरी कृषी विद्यापीठ